Jammu & kashmir : 370 वरून पाकिस्तानात खळबळ , उद्या संसदेचं संयुक्त अधिवेशन

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारत सरकारच्या या निर्णयाने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलणार असल्याने पाकिस्तानने या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या मंगळवारी संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७०भारत सरकारने हटवल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. हा निर्णय जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानने आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याची धमकी भारताला दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवून भारताने अतिशय भयंकर खेळी खेळली आहे. आता संपूर्ण भागात याचे घातक परिणाम दिसून येतील. पाक पंतप्रधान इम्रान खान काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न करत होते. पण भारताने हा प्रश्न आता आणखी किचकट बनवला आहे. कलम ३७० रद्द करून भारताने काश्मिरी नागरिकांवरील फास आणखी आवळला आहे. पाकिस्तान पूर्णपणे काश्मिरी जनतेच्या पाठिशी आहे, अशी गरळ पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ओकली आहे.
भारताच्या निर्णयाने पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला आहे. पाकिस्तानमधील केएसईचा निर्देशांक ६०० अशांनी घसरला. तर दुसरीकडे पाक पंतप्रधान इम्रान खान यांनीही संसदीय समितीची बैठक घेतली. या बैठकीत इम्रान खान परिस्थितीची आढावा घेतला.
भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारत सरकारच्या या निर्णयाने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलणार असल्याने पाकिस्तानने या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या मंगळवारी संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी उद्या मंगळवारी संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संसदेचं संयुक्त अधिवेशन उद्या सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. यावेळी काश्मीरमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला पाकिस्तानी सुरक्षा दलांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या पाकिस्तानच्या या संयुक्त अधिवेशनात काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.