जम्मू -काश्मीर ३७० कलम : शिवसेना भवानात पेढे वाटून आनंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. अमित शाह यांनी घोषणा करताना कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा केली. यासोबतच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला. एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करत असताना, मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. निर्णयाचं स्वागत करताना शिवसेना भवानात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना सांगितलं की, “हा खरंच एक ऐतिहासिक दिवस आहे. इतके दिवस जे स्वप्न या देशातला प्रत्येक नागरिक ह्दयाशी बाळगून होता ते पूर्ण झालं आहे”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. त्यांचंही हे स्वप्न होतं, जे पूर्ण झालं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले.