OBC Reservation : राज्य सरकारने काढलेला जीआर बेकायदेशीर आणि संविधानविरोधी : लक्षण हाके
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत तसा शासन आदेश काढल्यानंतर राज्यातील ओबीसी नेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र हा 13-14 कोटी लोकांचा आणि वेगवेगळ्या जात समूहांचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना, आमदारांना आणि खासदारांना फक्त मराठाच मतदान करतात, असे वाटते. हे राज्य मराठी माणसांचं नाही तर फक्त मराठ्यांचं आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने काल जो जीआर काढला तो बेकायदेशीर आणि संविधानविरोधी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी पायघड्या घातल्या. त्यांना पाठिंबा द्यायला आमची हरकत नाही. पण ओबीसींच्या आरक्षणाचा काय, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.ओबीसीचा आता लढा सुरु होणार, छगन भुजबळ साहेबांच्या लढाऊ वृत्तीचे अभिनंदन करणार आहे. भुजबळ साहेबांनी मोठा लढा उभा केला आहे. आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण येत आहे.
ओबीसी आरक्षणावर सत्तेतील ना विरोधक नेते बोललेत. इथल्या नेत्यांना फक्त मराठा समाज दिसतोय. राज्यातील ओबीसी आरक्षण संपले आहे. जीआर आम्हाला जेवढं समजतो त्यानुसार ओबीसी आरक्षण संपले आहे. तायवडे साहेबांना जीआर समजला नाही, असं वाटतंय. पुढच्या दरवाज्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळतं नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना जास्त समजतं का? सोशल जस्टीस त्यांना समजतं का? कारखानदरांचे नेते व्हायचं आहे त्यांना, लाज वाटली पाहिजे त्यांना असं वक्तव्य करताना तुम्हाला असा जीआर काढण्याचा अधिकार कुणी दिला,त्यांनी आम्हांला शहाणपणा शिकवू नये. ओबीसींची संघर्ष यात्रा सुरु करणार,मराठवाड्यातून आरक्षण यात्रा सुरु करणार. ओबीसी समाजाने या यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
राज्य सरकारकडून काल जो मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यात आला, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकारला असा बेकायदेशीर जीआर काढण्याचा अधिकार नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. तसेच कालच्या या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले. मराठ्यांना आणि मनोज जरांगे पाटलांना ज्या ज्या नेत्यांनी मदत केली, त्या सगळ्या नेत्यांवर बहिष्कार टाकणार असंही लक्ष्मण हाकेंनी सांगितले. ओबीसींच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांची नावे निश्चित करणार आणि मनोज जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवर बहिष्कार टाकायला सांगणार, असं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलं. ज्या बारामतीमधून मनोज जरांगे पुढे गेलेत, त्याच बारामतीत आम्ही जाऊन आंदोलन करणार, असंही लक्ष्मण हाकेंनी सांगितले.
