MaharshtraPoliticalUpdate : गटनेतेपदी पुन्हा निवड होताच देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मनातील खदखद !!
मुंबई : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नेतेपदी निवड झाल्यानंतर आजच्या आपल्या भाषणात फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानताना मनातील खदखद बोलून दाखवली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की , २०१९ मध्ये राज्यात महायुतीला बहुमत मिळालं होतं. पण शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आडमुठी भूमिका घेतली. यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. फडणवीस यांनी या प्रकाराला बेईमानी असं म्हटलंय. फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्याकाळात झाली. मी त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही.
फडणवीस यांनी एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल असं सांगताना म्हटलं की, २०१९ मध्ये बेईमान सरकार येताच त्यांनी सुरुवातीच्या अडीच वर्षात खूप त्रास दिला गेला. आमदारांना, नेत्यांना त्रास दिला. पण या परिस्थितीतही अडीच वर्षात एकही आमदार मला सोडून गेला नाही याचा मला अभिमान आहे. सगळे आमदार संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळे २०२२ मध्ये आपलं सरकार आलं आणि आता पुन्हा महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं.
यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक….
यावेळी प्रामुख्याने त्यांनी सांगितलेले की , सगळ्यांचे आभार की एकमताने माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केली त्याबद्दल आभार यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं.तर मोदी है तो मुमकीन है हे सुद्धा लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं. महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं.. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो…तसेच भगवान बिरसाामुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन…
आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो. आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू.माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं. आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही… लार्जर इंटरेस्टमधे आपण एकत्र काम करू…कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरूद्ध होतात तरीही लार्जर इंटरेस्टमधे आपण सगळ्याशी जुळवून घेऊ…