MahayutiNewsUpdate : चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात, येत्या दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील दोन मोठ्या आघाडींमधील जागावाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. तर महायुतीतील जागावाटपाची स्थिती अद्याप अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, महायुतीमध्ये कोणता पक्ष कोठे आणि किती जागा लढवणार, याबाबत बैठकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच बैठकी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उर्वरित जागांवर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.” उमेदवारांच्या यादीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही यादी केव्हाही जाहीर होऊ शकते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपुरात पोहोचले असता यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारांच्या यादीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “आमची जागावाटपाबाबतची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कालच्या चर्चेत ज्या जागांवर हा मुद्दा रखडला होता, त्या जागांवर एकमत झालं आहे. आणि ज्या जागांवर हा मुद्दा प्रलंबित आहे, त्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उमेदवारांच्या यादीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही ठरवले आहे की, ज्या जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, त्या पक्षांना त्यांच्या आवडीनुसार उमेदवारांची नावे जाहीर करता येतील. भाजपबद्दल बोलायचे झाले तर ते आमचे संसदीय मंडळ आहे. उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आहे. पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे.” महायुतीतील जागावाटपाच्या सुत्रांच्या प्रश्नावर, लवकरच माहिती दिली जाईल.” असे फडणवीस म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, दिल्लीतील बैठकीनंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घेतलं. दिल्ली दौऱ्यानंतरच्या देवदर्शनाचा संबंध जोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी सगळं व्यवस्थित चाललं असल्याचं सांगितलं.
लवकरच आम्ही तिघं एकत्र पत्रकार परिषद घेऊ आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ, असं अजित पवार म्हणताच काही पत्रकारांनी जागावाटपाचं सूत्र विचारलं असता, फॉर्म्युला आमचं आम्ही ठरवू. फॉर्म भरायच्या आता सगळं जागावाटप होईल, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी बुधवारी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी शनिवारी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
अजित पवार यांना अमित शाह यांची पुन्हा विनंती….
अजित पवार यांनी जास्तीच्या जागांचा आग्रह सोडावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीत केल्याची माहिती आहे. जवळपास अडीच तास चौघा जणांची चर्चा झाली. यावेळी महायुतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती आहे. भाजप विधानसभेच्या १५५ जागा लढवण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७८, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ५५ जागा लढणार, असं म्हटलं जातं. तर मित्रपक्षांना प्रत्येकाला आपापल्या कोट्यातून जागा सोडायची आहे.