Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर केलेले आरोप ऐकून तुम्हीच चक्रावून जाल , बघा तर खरं , काय काय म्हणाले ?

Spread the love

श्रावस्ती : ‘काँग्रेस सत्तेवर आल्यास ‘हे लोक सनातन धर्म नष्ट करतील , सर्वोच्च न्यायालयाचा राम मंदिराचा निर्णय बदलून पुन्हा राम मंदिराला बाबरीचे कुलूप लावतील आणि रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवतील , दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेऊन जे व्होट जिहाद करतात, त्यांना ते देणार आहेत. तसेच सीएए रद्द करतील, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० प्रस्थापित करतील शिवाय जे दहशतवादी आज तुरुंगात आहेत, त्यांना काँग्रेस पंतप्रधानांच्या घरी आमंत्रण देऊन बिर्याणी खाऊ घालेल,’ गरिबांचे जन धन खाते बंद करून त्यातील पैसे काढून घेतील, असे एक ना अनेक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील श्रवस्ती येथे बोलताना केले.

भाजपचे उमेदवार साकेत मिश्रा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचा समाचार घेतला. सन २०१७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची आघाडी अपयशी ठरली होती. त्याची आठवण मोदींनी करून दिली. ‘त्यांनी ६० वर्षांत काहीही केलेले नाही आणि आता ते मोदी व त्यांचे काम थांबवण्यासाठी एकत्र आले आहेत. उत्तर प्रदेशात दोन मुलांचा फ्लॉप चित्रपट पुन्हा प्रसिद्ध होत आहे,’ अशी टीका करत मोदी यांनी ‘दोन शहजादे मोदींनी केलेले काम थांबवतील,’ असा इशारा देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना लक्ष्य केले. तसेच, ‘दोन्ही पक्ष जनधन खाती बंद करतील, त्यातील पैसै काढून घेतील. शिवाय वीजजोडणी तोडतील आणि नळही पळवून देतील,’ असा आरोपही मोदी यांनी केला.

काँग्रेस व समाजवादी पक्ष ‘पाकिस्तानचे सहानुभूतीदार’ आहेत,

बस्ती येथील प्रचारसभेत मोदी यांनी काँग्रेस व समाजवादी पक्ष ‘पाकिस्तानचे सहानुभूतीदार’ आहेत, असा आरोप करून हे पक्ष पाकिस्तानच्या अणुऊर्जेची भीती दाखवून देशाला घाबरवत असल्याचा दावा केला.

‘दहशतवादाचा हा आश्रयदाता एकेकाळी आपल्याला घाबरवत होता, आता तिथल्या लोकांना साधे अन्नधान्य मिळवणेही कठीण झाले आहे. पाकिस्तान संपला आहे, मात्र त्यांचे सहानुभूतीदार असलेले सपा आणि काँग्रेस देशाला घाबरवण्यात व्यग्र आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. ‘ते म्हणतात, आपण पाकिस्तानला घाबरले पाहिजे कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. त्यांना माहीत नाही का, की ५६ इंची छाती काय असते. हे कमजोर काँग्रेस सरकार नाही, परंतु सशक्त मोदी सरकार आहे,’ असे त्यांनी बजावले. बस्ती येथे हरिश द्विवेदी भाजपचे उमेदवार आहेत.

‘मतपेढीसाठी ममतांकडून देशाची सुरक्षिततेशी तडजोड’

दरम्यान कांथी (प. बंगाल) येथे बोलताना  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मतपेढीच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याचा व घुसखोरांना राज्याचे लोकसंख्याशास्त्र बदलण्याची परवानगी देण्याचे पाप केल्याचा आरोप केला. राज्यात भाजपने ३० लोकसभा जागा जिंकल्यावर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडून बॅनर्जी सरकारला निरोप दिला जाईल, असा दावाही शहा यांनी प्रचारसभेदरम्यान केला. ‘घुसखोरांमुळे राज्याचे लोकसंख्याशास्त्र बदलू लागले असून त्याचा परिणाम केवळ बंगालवरच नव्हे तर संपूर्ण देशावर होत आहे. हे घुसखोर ममतांची मतपेढी आहेत आणि त्यांनाच खूष करण्यासाठी त्या सीएएला विरोध करत आहेत,’ असा आरोपही शहा यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!