PuneNewsUpdate : हिंदूराष्ट्रासाठी घटना दुरुस्ती करण्याची धीरेंद्र शास्त्रीची मुक्ताफळे ..
पुणे : भारतीय संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. हिंदूराष्ट्रासाठी आणखी एकदा घटनादुरुस्ती झाली तर काय बिघडले , अशा आशयाचे वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंदूराष्ट्राच्या मागणीबाबत विचारले असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला आहे. मीही संविधानाचा स्वीकार करतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे. पण सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचे आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झाले की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल.”
पुण्यात सोमवार ते बुधवार हे तीन दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग व दरबार कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. धीरेंद्र शास्त्री हे सत्संग आणि दरबारच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्यावर महाराष्ट्र अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत हिंदूराष्ट्राची मागणी केली आहे.
तर तुमची तिरडी बांधली जाईल…
दरम्यान हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचे ? असा प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचे आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही… हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.”