DiwaliNewsUpdate : दिवाळीनिमित्ताने बाजारपेठेत 3000 कोटींची उलाढाल , 41 टन सोन्याची विक्री …
मुंबई : यंदाच्या दिवलीनिमित्ताने बाजारपेठेत उत्साह असून धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. विशेषत: कालचा शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
दरम्यान या निमित्ताने देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली असून या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली आहे. ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा सुमारे 30,000 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा आकडा 27,000 कोटी रुपये होता. सुमारे 3,000 कोटी रुपयांची चांदी किंवा त्याच्या वस्तूंची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये धनत्रयोदशीला 25,000 कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय झाला होता.
सोन्या चांदीच्या विक्रीत 5 हजार कोटींची वाढ
पंकज अरोरा यांच्या माहितीनुसार, सोन्याचा भाव शुक्रवारी 62 हजार रुपये तोळा आणि चांदीचा भाव किलोला 72 हजार रुपये होता. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव 52 हजार रुपये तर चांदीचा भाव 58 हजार रुपये होता. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची एकूण 25 हजार कोटींची उलाढाल झाली होती. यावेळेस ही वाढ 5 हजार कोटींनी वाढून 30 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
41 टन सोन्याची विक्री
एका अंदाजानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी देशात सुमारे 41 टन सोने आणि सुमारे 400 टन चांदीचे दागिने आणि नाण्यांची विक्री झाली आहे. तर दुसरीकडे, ट्रेडर्स फेडरेशन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या अंदाजानुसार, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 50 हजार कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार झाला आहे, तर एकट्या राजधानी दिल्लीतच 5,000 कोटींपेक्षा जास्त व्यापार झाला.