MaharashtraNewsUpdate : गोवंश वाहतुकीच्या संशयावरून बजरंग दल कार्यकर्त्यांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू , एक जखमी

नाशिक : गोवंश वाहतुकीच्या संशयावरून जमावाकडून एकाची हत्या करण्यात आलीय, तर एकजण गंभीर जखमी आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष म्हणवणारी व्यक्ती या घटनेत मुख्य आरोपी आहे. पप्पू उर्फ प्रदीप गोपाळ आडोळे असे त्याचे नाव आहे. या घटनेत पडघा येथील लुकमान अन्सारी यांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी एकूण १५ ते १६ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ६ जणांना अटक करण्यात आलीय, तर इतरांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात गोवंश वाहतूक करणारे आणि त्यांना मारहाण करणारे यांच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींपैकी एकाच्या गाडीवर स्वतःचा फोटो आणि राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष असल्याचा उल्लेख असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे, तर अजून एक आरोपी हा बजरंग दलासाठी काम करत होता अशी माहिती आहे. पोलीस निरीक्षक राजू. एस. सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ज्यांनी वाहन अडवले त्यांच्याविरोधात सुरुवातीस आयपीसी कलम ३४१, ३२६, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याच घटनेत तिघांमधील एक इसम मृत्यू झाला आहे. त्यामुळे यात ३०२ च्या कलमाचा अंतर्भाव केलेला आहे तर दुसरा गुन्हा, गोवंशाची वाहतूक करण्यासंदर्भातील आहे.”
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सुर्वे म्हणाले की , ८ तारखेला रात्री आणि ९ तारखेच्या पहाटे गोवंशाच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना एका गटाने आडवले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. यात आम्ही दोन गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा गोवंशाची वाहतूक करण्यासंदर्भातील आहे, तर दुसरा गुन्हा मारहाण करणाऱ्यांविरोधातील आहे,” असंही पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी सांगितलं.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांच्या माहितीनुसार ८ जून २०२३ च्या रात्री ९ वाजता इगतपुरीहून कसाऱ्याकडे गोवंश घेऊन जाणारा टाटा पिकअप ट्रक इगतपुरीतील काही युवकांनी कसाऱ्यात पकडला.तिथे जमावाने ट्रकमधील लोकांना मारहाण केली आणि तो ट्रक त्यांनी इगतपुरीजवळील घाटनदेवी मंदिराजवळ आणत पीक अप ट्रकमधील लुकमान आणि अतिक यांना परत लाकडी दांडे, स्टील रॉडने पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत जमावाने लुकमानला जखमी अवस्थेत सोडून दिले आणि अतिकला घेऊन जमाव इगतपुरी पोलीस ठाण्यात गेला.
दरम्यान पोलिसांनी जमावाला शांत करत अतिकला दवाखान्यात दाखल केले आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत अवैध गोवंश वाहतूक केली म्हणून अतिक आणि लुकमान विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, १० जून २०२३ रोजी लुकमानचा मृतदेह घाटनदेवीजवळ सापडला. त्यानंतर पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. ९ आणि १० जून २०२३ रोजी लुकमानचे आई-वडील इगतपुरी पोलिसांना विचारत होते की, “तो कुठे आहे?” यावर पोलिसांनी ‘पळून गेला ’ असे उत्तर दिल्याचा दावा लुकमानच्या आई-वडिलांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार लुकमानच्या डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांनी ६ संशयितांना ताब्यात घेतले ससून अधिक तपास चालू आहे.