RamdasAthwaleNewsUpdate : मनसेसोबत युती भाजपच्या प्रतिमेला धक्का : रामदास आठवले

ठाणे : मुंबई महापालिका निवडणुकांठी भाजपने राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर युती केल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली. दलित पँथर चळवळीच्या ५० वर्षाच्या वाटचालीवर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी मंत्री आठवले आचार्य अत्रे रंगमंदिरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आगामी पालिका निवडणुकीत भाजप मनसे बरोबर युती करण्याचे वारे आहेत याविषयी आठवले म्हणाले, राज ठाकरे यांना माझा व्यक्तिशा विरोध नाही मात्र त्यांच्या भोंगा, उत्तर भारतीय विरोध अशा काही विषयांना माझा विरोध आहे. भाजपचे हिंदी भाषिक राज्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही ठिकाणी त्यांची राज्ये आहेत. अशा परिस्थितीत मनसे बरोबर युती केल्यास भाजपला त्याची किंमत चुकवावी लागेल आणि भाजपच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील महापालिकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि रिपाई आठवले गट एकत्र युती करुन लढणार असल्याने या युतीमध्ये मनसेची गरज नाही, असे ते म्हणाले. प्रा. विठ्ठल शिंदे लिखित दलित पँथर क्रांतिकारी नोंदी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी मंत्री आठवले यांनी पँथर चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईतील अनेक भागात झोपड्यांचा विषय प्रलंबित आहे. याविषयी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. हा विषय मार्गी लागेल असे प्रयत्न होतील.