GujratRainUpdate : गुजरातमध्येही धुव्वाधार , २७ हजाराहून अधिक लोक पुरामुळे बाधित

अहमदाबाद : संपूर्ण देशभरात पावसाने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही धुव्वाधार पाऊस चालू आहे. मंगळवारीही गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये आणखी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. १ जूनपासून राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६९ जणांना जीव गमवावा लागला आहे. पूरग्रस्त भागातून एकूण २७,८९६ लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी १८,२२५ अजूनही निवारागृहांमध्ये आहेत आणि उर्वरित त्यांच्या घरी परतले आहेत.
दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सौराष्ट्रातील कच्छ आणि राजकोटच्या काही भागात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून कच्छमधील अंजार तालुक्यात १६७ मिमी पाऊस झाला, तर जिल्ह्यातील गांधीधाम तालुक्यात १४५ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण गुजरातमधील नर्मदा, सुरत, डांग, वलसाड आणि तापी जिल्हे आणि राज्याच्या मध्यवर्ती भागातील पंचमहाल आणि छोटा उदयपूर येथेही जोरदार पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याने (IMD) बुधवारी वलसाड, नवसारी, सूरत, तापी, डांग, नर्मदा, छोटा उदयपूर जिल्ह्यांसह सौराष्ट्र विभागातील कच्छ, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका आणि मोरबी येथे अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. रेड अलर्ट जारी केले आहे.
नवसारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्णा आणि अंबिका नद्यांना पूर आला असून, काही सखल भागात पूर आला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने संयुक्त कारवाईत नर्मदा जिल्ह्यातील राजपिपलाजवळ कर्जन नदीच्या काठावर अचानक पाणी वाढल्याने अडकलेल्या २१ जणांची सुटका केली.