AurangabadNewsUpdate : …तर राज ठाकरे यांची सभा उधळण्याचा भीम आर्मी संघटनेचा इशारा

मुंबई : पोलिसांच्या सशर्त परवानगीने औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला महाराष्ट्रातील भीम आर्मी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार असून या सभेत नियमांचे उल्लंघन झाल्यास सभा उधळण्याचा इशारा देण्यात आला आहे . याशिवाय औरंगाबाद शहरातील वंचित बहुजन आघडीसह विविध पक्ष संघटनांचा विरोध असल्याने हि सभा शांततेत पार पाडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
बऱ्याच चर्चेनंतर आणि प्रतीक्षेनंतर पोलिसांच्या परवानगीने राज ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी मनसेने केली आहे . या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबाद पोलिसांकडून सभेला परवानी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्याच दरम्यान भीम आर्मीने राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाने 16 अटी दिल्या आहे. त्या अटींचे उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , शाहू महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे.
या अटी -शर्तींचे पालन व्हावे
राज ठाकरे यांच्या या सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी तसेच १५ हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. संध्याकाळी साडेचार ते रात्री पावणे दहा वाजेच्या वेळेत आयोजित करण्यात यावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळत कोणताही बदल करण्यात येऊ नये. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेत येताना किंवा जाताना कुणीही आक्षेपार्ह विधान, वर्तवणूक, घोषणाबाजी, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी येताना-जाताना कार किंवा बाईक रॅली काढू नये.
कार्यक्रमवेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचं प्रदर्शन करु नये. स्वयंसेवक नेमण्यात यावे. त्यांची नावे, मोबाईल नंबर पोलिसांना द्यावे. तसेच कोणत्या गावातून किती नागरीक येणार, त्यांची संख्या आणि त्यांच्या वाहनांचा प्रवासाचा मार्ग विषयी माहिती पोलिसांना द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाजाची मर्यादा असावी. त्या नियमांचा भंग केल्यास ५ वर्ष कारावास आणि १ लाख रुपये दंडांची शिक्षा होऊ शकते. सभेदरम्यान बस, मेडिकल, वीज, रुग्णवाहिका अशा इत्यादी अत्यावश्यक सेवांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.सभेसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.