MaharshtraCoronaUpdate : कोरोना नियमनाच्या जाचातून या १४ जिल्ह्यांची सुटका , सर्व काही होणार पूर्वीसारखे …
मुंबई : राज्यातील अनेक शहरात कोरोनाचा कहर आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने अनलॉकची नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यांची कोरोनाविषयक निर्बंधाच्या जाचातून मुक्तता झाली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये उद्या 4 मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी 100 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने हा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने काही निकष ठरवले असून त्यानुसार शहरांचे नव्याने A, B, C असे वर्गीकरण करण्यात आलं आहे. ज्या जिल्ह्यांना आता अनलॉक (Unlock) करण्यात आलं आहे ते A वर्गात मोडतात. तिथली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
नव्या नियमावलीनुसार 1 डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्के असावी., 2 डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्के असावी., संबंधित जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून कमी असावा. संबंधित जिल्ह्यातील भरलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या 40 टक्क्यांहून कमी असावी. या ठिकाणी – सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे तर इतर जिल्हे या निकषाला अद्याप पात्र झाले नसल्याने त्याठिकाणी अंत्यसंस्कार, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेळ, 50 टक्के उपस्थिती परवानगी देण्यात आली आहे.तर शॉपिंग मॉल्स, सिनेमागृह रेस्टारंट, बार, जिम स्पा, स्विमिंग पूल धार्मिक स्थळ, नाट्यगृह पर्यटन स्थळ मनोरंजन पार्क 50 टक्के क्षमतेची परवानगी असणार आहे.