AurangabadNewsUpdate : विनाकारण फिरणारांच्या स्वागतासाठी चौका-चौकात उभे आहेत पोलीस !!

औरंगाबाद : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने आज रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याअनुषंगाने अंमलबजावणीसाठी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे. शहरात नाकाबंदीसाठी ५५ फिक्स पॉईंट असणार आहेत. त्याठिकाणी चित्रीकरण देखील केले जाणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आता कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना उघडी राहणार आहेत. या वेळेतच नागरिकांना भाजीपाला, किराणा, दूध खरेदी करावी लागणार आहे. सकाळी अकराच्या नंतर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस व मनपाच्या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी दिली.
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
दरम्यान मनपाचे फिरते पथक विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी देखील करणार आहेत. सर्व १७ पोलीस ठाण्यांचा फोर्स आणि होमगार्ड असा तगडा पोलीस फाटा रस्त्यावर उतरणार आहे. तसेच अन्न व औषधी विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके देखील कारवाई करणार आहेत. त्यामुळे मुबलक मनुष्यबळ असून नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे. सोबत वैद्य कागदपत्रे बाळगा आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहायक आयुक्त अशोक बनकर यांनी केले आहे.