AurangabadNewsUpdate : ना ढोल ना ताशा , शांततेत होत आहे गणेश विसर्जन , सर्वत्र चोख बंदोबस्त
यंदा कोरोनाच्या संकटात श्रींच्या विसर्जनासाठी सार्वजनिक मिरवणुका, व्यक्तिगत विसर्जनाला जरी मनाई असली तरी मोठ्या संख्येने घरोघर गणराय विराजमान आहेत. आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेने गणेश मुर्ती संकलनासाठी ठिकठिकाणी सोय केली आहे. त्या अनुषंगाने पोलिस दल सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे.
कोरोनाच्या संकट काळात सर्व महत्त्वाचे सण घरात राहूनच साजरे करावे लागत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदा ढोल-ताशाच्या गजरात निघणा-या मिरवणुका शासनाने प्रतिबंधीत केल्या आहेत. त्यामुळे गणपती विसर्जनाचा उत्साह यंदा दिसून येणार नाही. त्यातच अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशाची स्थापना केली नसल्याने पोलिसांवरील ताण काही अंशी कमी झाला आहे. परंतू, विसर्जनावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये. यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मंगळवारी विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांनी जमा होऊ नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. महापालिका प्रशासनाने मुर्ती संकलनासाठी ठिकठिकाणी सोय केली आहे. नागरिकांना आपल्या घरातील गणेश मुर्ती महापालिकेच्या पथकाकडे सुपूर्द करायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व गणेश मुर्ती एकत्र करुन त्यांचे विसर्जन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे.
……
असा आहे बंदोबस्त…..
तीन उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, ३२ पोलिस निरीक्षक, ७१ सहायक पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, एक हजार १४३ कर्मचारी, एक राज्य राखीव बलाची कंपनी, एक रॅपीड अॅक्शन फोर्स तसेच साडेतीनशे होमगार्ड यांचा शहरात खडा पहारा आहे.
……..
न.प. ग्राम पंचायत, पं. स. तीचा संकलनासाठी पुढाकार…..
जिल्ह््यातील गणेश विसर्जनासाठी नगर परिषद, ग्राम पंचायत, पंचायत समिती यांच्या वाहनातून घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तींचे संकलन केले जाणार आहे. त्यानंतर गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाईल. त्यासाठी जिल्ह््यात पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सात विभागीय पोलिस अधिकारी, १८ निरीक्षक, ३६ सहायक पोलिस निरीक्षक, ६६ उपनिरीक्षक, एक हजार २५७ कर्मचारी, तीनशे होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.