MaharashtraUpdate : चर्चेतली बातमी : १५ जून नंतर पुन्हा लॉकडाऊन होणार का ? मुख्यमंत्र्यांनी दिला हा इशारा…
राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि प्रत्येक ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या अनलॉकचा दुरुपयोग घेणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकार पुन्हा १५ जून पासून लॉकडाऊन कडक करणार असल्याच्या अफवा उठवल्या जात असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून गर्दी केली जात असल्याचे चित्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत असल्याने, नागरिकांनी गर्दी कमी करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. त्यात काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. ही सवलत देताना सरकारने काही अटी घातलेल्या आहेत. त्या अर्थातच जनतेच्या हिताच्या आहेत. आपल्याला सर्वांनाच सावध राहून जगावे लागणार आहे, याचे भान सदैव असू द्या, असे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणले कि , सरकार अत्यंत सावधपणाने पावले टाकत आहे. जसे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने केले. तशीत त्यात शिथिलताही टप्प्याटप्प्याने आणायची आहे. हळूहळू सर्वकाही आपल्याला पूर्वपदावर आणावे लागणार आहे. करोनाशी लढत असताना अर्थचक्र बंद ठेवून चालणार नाही. त्यामुळेच आपण हे पाऊल टाकत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही, असे सांगत त्यांनी लोकांना खबरदारी बाळगण्याबाबत आवाहन केले. आपल्याला आता करोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. मी तुमच्याशी मास्क लावून बोलतोय. त्याचे कारण तेच आहे. सुरक्षित अंतर हे आपल्याला राखावेच लागेल. ते राखले जाईल, हे गृहित धरून सवलती देण्यात आल्या आहेत. वादळाचा धोका टळल्यानंतर या सवलतींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदानांत वा अन्य ठिकाणी वॉक घेण्यास मुभा दिली गेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी वॉकसाठी झुंबड उडाल्याचे मला दिसले. साहजिकच त्याने धाकधूक वाढली आहे. तुम्हाला व्यायाम करता यावा. वॉक घेता यावा म्हणून तुमच्या आरोग्यासाठी सरकारने सवलत दिली आहे. आरोग्य बिघडवून घेण्यासाठी ही सवलत नाही, हे लक्षात असू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. लॉकडाऊनमधून दिलेली उघडीप जीवघेणी ठरणार असेल तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण मला खात्री आहे, जनता ती वेळ येऊ देणार नाही. राज्यातील जनता सुज्ञ आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , मुंबईत लोकलसेवा अद्याप सुरू झालेली नाही. बेस्ट सेवा पूर्ण क्षमतेने चालवली जात नाही. सरकार स्थितीचा अंदाज घेऊन विचार करून पावले टाकत आहे. त्यामुळे कुणीही घाई करू नये, गर्दी टाळावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांने केले आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी मर्यादित लोकलसेवा सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहोत. केंद्राने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
दरम्यान मंत्री व सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याच्या बातम्याविषयी खुलासा करताना मुख्यमंत्री म्हणले कि, या बातम्या चुकीच्या आहेत. असा कोणताही वाद झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत बाहेरचे कोणी येत नाही. मग वाद झाला म्हणता तर तो बघितला कुणी?, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विभागाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता आणला गेल्याचा आरोप केल्याचे सांगितले आहे. त्याचा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचे काम करत असतं, तिथे कुणी मारामाऱ्या करायला येत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.