AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : जिल्ह्यात 1305 कोरोनाबाधित, आज 20 रुग्णांची वाढ, 55 मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1305 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सुभाषचंद्र बोस नगर, एन 11, हडको (4), भवानी नगर (2), रोशन गेट (1), हुसेन कॉलनी (1), बायजीपुरा (1), इटखेडा, पैठण रोड (1), अल्तमश कॉलनी (1), जवाहर नगर, गारखेडा परिसर (1), शाह बाजार (1), मयूर नगर, एन-6, सिडको (1), राम नगर, एन 2 (1), गजानन मंदिर परिसर (1), जहांगीर कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर (1), रोहिला गल्ली (1), समता नगर (1), जुना मोंढा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 11 महिला आणि नऊ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
घाटीतून 13 कोरोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 13 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गोगा बाबा मंदिर, उस्मानपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, अक्सा मस्जिद, बारी कॉलनी, शहा बाजार, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील आहेत.
कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.30 वाजता, गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.
कोविड केअर केंद्रातून 89 कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रातून आज एकूण 89 कोरोनाबाधितांना ते बरे झाल्याने सुटी देण्यात आली. तर शहरातील दोन खासगी रुग्णालयात आतापर्यंत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, असे मनपा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
मिनी घाटीमध्ये आतापर्यंत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला आहे. घाटीमध्ये आतपर्यंत 50 आणि खासगी रुग्णालयात चार अशा एकूण 55 कोरोनाबाधितांचा आजपर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.