राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा
मुंबई । प्रिया मोहिते ।
‘लोकशाही, निवडणुका व सुशासन’ याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने २०१८ पासून लोकशाही पंधरवड्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि वेळेवर पार पाडण्यासाठीच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे; परंतु राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग यांच्या कार्यकक्षेतील फरक आणि अधिकारांबाबत सर्व संबंधित घटकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या पंधरवड्यानिमित्ताने लोकशाही व सुशासन या संदर्भात जनजागृती करणे तसेच विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरणाचा संदेश पोहोचविणे असे अनेक उपक्रम या पंधरवड्यानिमित्ताने राबविले जाणार आहेत असे राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले.