Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

झारखंड विधानसभा भाजपच्या अहंकाराचा पराभव , शरद पवारांची मोदी सरकारवर टीका , महाराष्ट्रासह पाच राज्यात आता सत्ताबदल

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी झारखंडच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा व आघाडीने बहुमत मिळविल्याने अभिनंदन केले आहे.  भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचे  निकाल जाहीर झाले असून यात झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या आघाडीला बहुमत मिळाले आहे.  यामध्ये सत्ताधारी भाजपला धक्का बसला. या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. सध्या देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला लोक एकजूटीने हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. निवडणुकीत आपण कसेही जिंकू येऊ, असा अहंकार भाजपने दाखवला. मात्र, झारखंडच्या जनतेने त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिले आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर होते. निवडणुकीनंतर या राज्यात बदल झाला असून भाजप सत्तेतून पायउतार झाला आहे. देशात होत असलेल्या बदलाच्या प्रवाहात झारखंडही सहभागी झाले असून आपण जनतेचे आभार मानत असल्याचे पवार यांनी सांगितले. झारखंडमधील परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. या राज्यात आदिवासी आणि गरिबांची संख्या मोठी आहे. त्याही परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता झारखंडच्या जनतेने आपला कौल दिला आहे.

मोदी सरकारवर टीका करताना पवार म्हणाले कि , केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारला देशातील परिस्थिती हाताळण्यास अपयश आले आहे. महाराष्ट्राने भाजपविरोधात एकजूट दाखवत मार्ग दाखवला. झारखंडनेही तोच मार्ग अवलंबत भाजपविरोधात एकजूट दाखवली. त्यामुळे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने देशातील इतर राज्यातही बदल पाहण्यास मिळेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील एक उमेदवार विजयी झाला असल्याची माहिती पवार यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!