Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपसोबतची युती तुटली म्हणजे आमचे धर्मांतर नाही झाले , आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

भाजपबरोबरची आमची युती तुटलेली आहे. आम्ही राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहोत. युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं असं नाही. आम्ही कालही हिंदूच होतो आणि आजही हिंदूच आहोत. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. संपूर्ण नागपूर मला भगवामय झालेलं पाह्यचं आहे. निर्वासित काश्मिरी पंडितांना घरं देण्याची मागणी सर्व प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती.

नागपूर येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना काय आहे? आणि आमची ओळख काय आहे? हे सांगण्याची गरज नाही. सत्ता आल्यानंतर उतू नये, मातू नये आणि घेतला वसा सोडू नये, असं म्हटलं जातं. त्यामुळे सत्ता आली तरी आम्ही बदललो नाही आणि तुम्हीही बदलला नाहीत, असं सांगतानाच माझ्याकडे सध्या असलेली जबाबदारी मोठी आहे. आव्हानं मोठी आहेत. पण जे शिवधनुष्य मी पेललं आहे, त्याला तुमच्यासारखे साथीदार हवे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा कुटुंबप्रमुख आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाच. दिलेली वचनं पूर्ण करणारच. आमच्या वचनांची आठवण करून द्यायला आम्हाला स्मृतीभ्रंश झालेला नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. गोरगरिबांना ‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे,’ असं बोलणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही गोरगरिबांच्या पाठी आहोत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री झाल्यावर मी विदर्भातील दोन जिल्ह्यांचा आढावा घेतला. कामे अजून तशीच बाकी आहेत. प्रश्न काहीही सुटलेले नाहीत, असं सांगतानाच आपल्याला कामं करायची आहेत. राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी सरकार म्हणून काम करायचे आहे. आधीच्या सरकारसारखं वागायचं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!