प्रकाश आंबेडकरांच्या कात्रीत काँग्रेस , भाजपची बी टीम असल्याचा आरोप सिद्ध करा तरच होईल चर्चा
प्रकाश आंबेडकरांनी आज एक पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका जाहीर करत काँग्रेसला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्याचा आधी काँग्रेसने खुलासा करावा जोपर्यंत काँग्रेस खुलासा करीत नाही आणि पुरावे देत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याचं त्यांनी जाहीर करताना आरोप केला कि , डोकेहीन झालेली काँग्रेस फक्त चर्चेचा प्रस्ताव देते चर्चा मात्र करत नाही. त्यामुळे चर्चा करायची की नाही हे त्यांनी आधी ठरवावं असा इशारा आंबेडकरांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर काँग्रेसने वचिंत आघाडीसोबत पुन्हा चर्चेचा प्रस्ताव दिलाय. लोकसभेत ८ ते १० जागांवर वंचितमुळे फटका बसल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. मात्र वंचितने ज्या अटी घातल्या होत्या त्या काँग्रेसला मान्य करणं शक्यच नव्हतं. लोकसभेसाठी तब्बल २२ जागा देण्याची मागणी वंचितने केली होती. आघाडी फिस्कटल्याने त्याचा फायदा भाजपला झाला.
आता विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने केलेल्या राजकीय आरोपांवर प्रकाश आंबेडकरांनी उत्तर मागीतलंय. तर आंबेडकरांनी या आधीच ४० जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. या दोनही अटी काँग्रेस मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही आघाडी होण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीत असा अंदाज व्यक्त केला जातोय. आंबेडकरांना आघाडी करायचीच नाही ते फक्त दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.