Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवडणूक आयोगाचा निर्णय अन्यायकारक : मायावती , १६ मे हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस : काँग्रेस

Spread the love

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या दोन सभा असल्यामुळेच आयोगाने गुरुवारी सकाळऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी केली असून अशाप्रकारे निर्णय घेणं अन्यायाकारक आहे. निवडणूक आयोग कोणाच्या तरी दबावाखाली काम करतोय असा आरोप बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. मोदी-शहा ममता बॅनर्जींना निशाणा बनवत असल्याची टीकाही यावेळी मायावती यांनी केली आहे.  तर काँग्रेसने ‘ १६ मे हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस  असल्याचे म्हटले आहे .
मंगळवारी कोलकाता येथे भाजप-तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. कोलकात्यात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुरुवार १६मेला रात्री १० वाजल्यापासूनच प्रचारबंदी लागू केली आहे. आचार संहितेच्या नियमांप्रमाणे मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचार थांबवणे बंधनकारक असतं. पण इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने कारवाई करत तीन दिवस आधीच प्रचारबंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे बंगालमधील नऊही मतदारसंघांमध्ये आज रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा आहेत. या प्रचारसभांमुळेच गुरुवारी सकाळपासून प्रचारबंदी लागू करण्याऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी लागू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याची टीका मायावतींनी केली आहे. निवडणूक आयोग भाजपबाबत पक्षपातीपणे वागत असून इतर पक्षांना अन्याय्य वागणूक देत आहे असंही त्या म्हणाल्या. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं. तसंच बंगालमध्ये सुरु असलेल्या राजकीय धुमश्चक्रीत मायावतींनी ममता बॅनर्जींची पाठराखण केली आहे. ‘मोदी- शहा ममतांना निशाणा बनवत आहेत. व्यवस्थित कट आखून त्यांची बदनामी करत आहेत. एका पंतप्रधानपदी बसलेल्या माणसाला हे अजिबात शोभा देत नाही

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फक्त मायावतींनीच नाही तर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुजेवाला यांनीही टीका केली आहे. ‘ १६ मे हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम १४ आणि २१चेउल्लंघन केलं आहे. तसंच सर्वांना समान संधी देण्याचा संविधानिक अधिकारही काढून घेतला आहे. हे अन्याय्य आहे.’ योगायोगाने पाच वर्षांपूर्वी १६मेलाच सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते ज्यात भाजप प्रचंड बहुमताने विजयी झालं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!