LK Advani: असे काय लिहिले अडवाणी यांनी कि , देशभर एकच चर्चा सुरु झाली …आणि चौकीदार मोदीही बोलते झाले , मी भाजपचा कार्यकर्ता …
सध्या लालकृष्ण अडवाणी चर्चेत आले आहेत. भाजपची तिकिटे जाहीर होत होती तेंव्हा त्यांचे तिकीट अमित शहा यांना दिले तेंव्हा अडवाणी चर्चेत आले. आणि आज सायंकाळी अचानक देशातील बातम्या बदलल्या. सायंकाळपर्यंत राहुल आणि प्रियांकाच्या वायनाडच्या बातम्या चालू होत्या तेंव्हा अचानक प्राईम टाईमची जागा अडवळणीला गेलेल्या अडवाणींनी घेतली !! असे काय झाले कि, अडवाणी चर्चेत आले !!का तर त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. हा ब्लॉग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती समजाला असेल माहित नाही, कारण तो त्यांनी अनुवादित करून वाचला असेल. आणि तशीही त्यांची समज त्यांच्या पुरती मर्यादित आहे. मी म्हणजे पक्ष आणि मी म्हणजे देश अशी नरेंद्र मोदी यांची विचारधारा आहे. ज्या संघाने मोदींना नेतृत्वाची संधी दिली तो संघ सुद्धा त्यांच्या पुढे लहान व्हावा अशी मोदींची परिस्थिती झाली आहे. थोडक्यात काय तर नरेंद्र मोदी पक्षापेक्षाही मोठे झाले आहेत हे सांगण्यासाठीच जणू अडवाणी यांनी हा ब्लॉग लिहिण्यासाठी श्रम वेचले असावेत असे वाटते.
मोदी जेंव्हा जेंव्हा चुकतात तेंव्हा तेंव्हा जबादार व्यक्तीकडून मोदींना वेसण घालावी लागते. ते मुख्यमंत्री असताना जेंव्हा गुजरात मध्ये दंगली उसळल्या तेंव्हा तक्तालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना “राजधर्माची” आठवण करून दिली तर आज मोदी जेंव्हा हम करे सो कायदा या न्यायाने वागू लागले आहेत तेंव्हा अडवाणी यांनी त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत पक्षाच्या विचारधारेची आठवण करून दिली आहे. त्यांनी ब्लॉग लिहिल्याचे समजताच मोदींनी आपल्या चेहऱ्यावरचा चौकीदाराचा मुखवटा बाजुला सारून ” मी भाजपचा कार्यकर्ता असून मला कार्यकर्ता म्हणून अभिमान आहे असे ट्विट केले आहे. उद्या जेंव्हा संघप्रमुख मोहन भागवत काही लिहितील तेंव्हा भाजप कार्यकर्त्याचा मुखवटा फेकून ते “मी स्वयंसेवक असून, स्वयंसेवक असल्याचा मला अभिमान आहे असे ट्विट मोदींनी केल्यास नवल वाटू नये.
नेमके काय म्हणताहेत अडवाणी ?
देशसेवा करणं हे माझ्या रक्तात आहे, त्याकडे मी एक मोहिम म्हणून पाहतो. मी वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. मागील सात दशकात माझे आयुष्य भाजपाशी जोडले गेले आहे. आधी भारतीय जनसंघ, त्यानंतर भाजपाचा संस्थापक सदस्य या आणि अशा अनेक जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या आहेत. पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर यांच्यासोबत मला काम करता आलं हे मी माझे भाग्य समजतो. निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत, त्या योग्य पद्धतीने आणि निष्पक्षपातीपणाने झाल्या पाहिजेत असेही मत आडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना आम्ही कधीही देशविरोधी किंवा देशद्रोही असल्याचे मानले नाही, असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले आहे. गांधीनगरयेथून तिकीट नाकारल्यानंतर प्रथमच अडवाणी यांनी आपले विचार ब्लॉगच्या माध्यमातून मांडले आहेत.
अडवाणी यांनी या ब्लॉगमध्ये पक्षाची धोरणे आणि सिद्धांत यावर प्रकाश टाकला आहे. आपल्या जीवनाचे ध्येय नेहमी देश प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः असेच राहिले आहे आणि याच सिद्धांतावर आजपर्यंत वाटचाल केली असून, यापुढेही हाच नेम कायम राहील. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा आणि भ्रष्टाचारमुक्त राजकीय पक्ष, हीच आमची प्राथमिकता राहिली, असे अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले.
देश प्रथम, पक्ष नंतर आणि अखेर स्वत:
भारतीय जनता पक्षाचा ६ एप्रिल रोजी वर्धापनदिन असतो. त्याच्या दोन दिवस अगोदर अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपली मते मांडली आहेत. लोकसभा निवडणुकीत ६ वेळा निवडून दिल्याबाबत अडवाणी यांनी गांधीनगरमधील जनतेचे आभारही मानले आहेत.
भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे, तर विरोधक मानतो. स्थापनेपासून हीच भाजपाची संस्कृती आहे, आमच्यापेक्षा वेगळी मतं मांडणाऱ्यांना आम्ही कधीही शत्रू मानलं नाही, असं त्यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त लिहिलेल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे. ६ एप्रिलला भाजपाचा ३९ वा स्थापना दिन आहे.
कित्येक महिने जाहीर सभांमधून भाषणं न करणाऱ्या, संसदेतही मौन बाळगणाऱ्या अडवाणींनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘देश प्रथम, पक्ष नंतर आणि अखेर स्वत:,’ या शीर्षकानं अडवाणींनी ब्लॉग लिहिला आहे. राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘आमच्या मतांपासून फारकत घेणाऱ्या, आमचे विचार पटत नसलेल्यांना आम्ही कधीच शत्रू मानलं नाही. आम्ही त्यांना केवळ विरोधकच समजलं.
पक्षांतर्गत आणि राष्ट्रीय पातळीवर लोकशाहीला नेहमी प्राधान्य देत लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी भाजप आग्रही राहिला. पक्ष स्थापनेपासून पक्षाचे धोरण स्पष्ट आहे. सत्य, राष्ट्र निष्ठा आणि लोकशाही या त्रयींमुळेच भाजपचा विकास झाला. या मूल्यांच्या आधारावरच सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि सुराज्य यांचा जन्म होतो आणि हेच ध्येय उराशी बाळगून पक्षाने आजपर्यंत वाटचाल केली आहे. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवादरम्यान, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि संविधानिक संस्थांनी प्रामाणिक परीक्षण करावे, असे आवाहन अडवाणी यांनी शेवटी केले.
काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम हटवण्याचं आश्वासन दिले . त्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाव रदेखील अडवाणींनी ब्लॉगमध्ये भाष्य केलं. ‘भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेनुसार, आम्हाला राजकीय विरोध करणाऱ्यांना आम्ही कधीही देशद्रोही म्हटलं नाही. प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे, असं पक्ष मानतो,’ अशा शब्दांमध्ये अडवाणींनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मोदींनी अनेकदा त्यांच्या सभांमध्ये ‘काँग्रेसमुक्त भारत’चा पुनरुच्चार केला आहे. त्याचवरुन अडवाणींनी मोदींचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केल्याचं बोललं जातं आहे.