Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी , शरद पवारांचा धमाका : उघड केली अखेर बंद दाराआड झालेली चर्चा… मोदींविषयी केला “हा” गौप्यस्फोट

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका लागल्यानंतर प्रचाराला लागलेल्या पवारांना अडवण्यासाही ईडी ने आपले शटर उगारताच शरद पवार कमालीचे आक्रमक झले आणि त्यांनी काहीही झले तरी राज्यातील भाजपचे सरकार उलथायचेच अशी खूणगाठ बांधली आणि पवार जे निघाले ते मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांना बसवूनच शांत झाले. पण पवार आणि शांत हे राज्याच्या रजकानात तरी शक्य नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दरम्यान आता तर त्यांनी एबीपी न्यूज ला दिलेल्या धडक मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले आहेत . त्यामुळे शरद पवार पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांची ही ऑफर आपण नाकारली, असा गौप्यस्फोट करून पवारांनी नवीन धमाका केला आहे. दरम्यान या प्रकरणावर भाजपकडून काही वक्तव्य येतेय का ? हे पाहणे आता अगत्याचे ठरणार आहे.


महाराष्ट्रात यशस्वी सत्ताबदल केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी या वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले कि , राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत मोदींची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर मोदींनी मला थांबण्यास सांगितलं आणि माझ्यासमोर एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. आपण एकत्रित काम केलं तर मला त्याचा आनंद होईल, असं मोदी म्हणाले. त्यावर आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत आणि ते यापुढेही राहतील. पण राजकीयदृष्ट्या तुमच्यासोबत काम करणं मला शक्य होणार नाही, असं सांगत मी त्यांची ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला.


दरम्यान पवारांच्या म्हणण्यानुसार  मोदींना राजकीयदृष्ट्या एकत्र काम करणं शक्य नसल्याचं सांगितल्यानंतरही मोदींनी त्यांना एकत्रित काम करण्याबाबत त्यांची मनधरणीही केली. विकास, उद्योग आणि शेतीबाबतची आपली मतं सारखीच आहे. त्यात आपली भूमिका वेगळी नाही, मग मतभिन्नता कुठे आली? असा सवाल करत विरोधकांनीही आमच्यासोबत येऊन देशासाठी काम केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. त्यावर विरोधाला विरोध करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे तुम्हाला विरोधाला विरोध होणार नाही. तसेच मी एक छोटासा पक्ष चालवतो. माझ्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आजपर्यंत जी दिशा दिली आहे, ती बदलणं आता शक्य नाही. त्यामुळे तुमचा एकत्रित येण्याचा आग्रह मी स्विकारू शकत नाही, असं पवारांनी मोदींना सांगितलं.

अजित पवारांच्या बंडाविषयी…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडावर पहिल्यांदा बोलताना शरद पवार म्हणाले कि , आजच्या आज तुम्ही शपथ घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, अशी अट अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना घातली होती. मात्र यातील मला काहीही माहित नव्हतं. मलाही सकाळीच फोन आल्यावर मी टीव्ही पाहिला तेव्हा अजितने शपथ घेतल्याचं मला दिसलं. एवढ्या सकाळी हे घडतंय हे पाहून मला विश्वासच बसला नाही. मात्र शपथविधीला उपस्थित असलेले चेहरे पाहिल्यानंतर मी निर्धास्त झालो. कारण माझ्या शब्दाचा मान ठेवणारे हे लोक होते. ते परत येतील आणि जे घडलंय ते आपण दुरुस्त करू शकतो, याचा मला विश्वास होता, असंही पवारांनी सांगितलं. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे सुद्धा एवढ्या पहाटे किती जोमाने काम करतात हे सुद्धा मला पहिल्यांदाच पाह्यला मिळालं, असा चिमटाही त्यांनी काढला.

काँग्रेस आणि शिवसेना 

काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सकारात्मक चर्चा होण्यासाठी आपण काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मन कसे वाळविले याविषयी बोलताना पवार म्हणाले कि ,शिवसेनेने आणीबाणीला दिलेला पाठिंबा, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकही उमेदवार न देता काँग्रेसला अप्रत्यक्षपणे केलेली मदत, राष्ट्रपतीपदाच्या निवणुकीत प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना दिलेला पाठिंबा आदी गोष्टी सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससाठी कशा अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतल्यात याकडेही सोनिया गांधी यांचे लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे पालिका निवडणुकीतही बाळासाहेबांनी काँग्रेसला केलेली मदत याचीही आठवण सोनिया गांधींना करून दिली, असं पवार म्हणाले. सोनिया गांधींना राज्यातील काँग्रेस नेत्यांची अस्वस्थताही कळाली असावी आणि शिवसेनेसोबत जाण्याचं झालेलं वातावरणही त्यांच्या लक्षात आलं असावं, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा असं पवार म्हणाले.

आपल्या भविष्यातील भाजपविरोधी राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले , सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत अद्याप काहीही चर्चा सुरू झालेली नाही. पण अशी प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. देशामध्ये भाजपविरोधात सक्षम पर्याय द्यायला हवा. यावर लोक चर्चा करत आहेत. मात्र त्यावर आम्ही अद्याप पुढे गेलेलो नाही. अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष तितके प्रबळ नाहीत. हे मान्य आहे. पण जर आम्ही महाराष्ट्रात वेगळा प्रयोग करून बलशाली होऊ शकतो, तर इतर राज्यातही ते व्हायला हवं. काँग्रेस पक्ष हा देशात विस्तारलेला पक्ष आहे. काँग्रेसचा देशभर बेस आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या नावामागचे कारण ?

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याची त्यांची इच्छा होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी तसं वचनही दिलं होतं. तसं त्यांनी आम्हाला बोलूनही दाखवलं. पण तीन पक्षाचं सरकार चालवण्यासाठी ज्यांच्या नावावर सर्वांची सहमती होईल अशा व्यक्तिची गरज होती. त्यामुळे उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावं असं सर्वांचं मत झालं. ही जबाबदारी उद्धव यांनीच पार पाडावी असं सर्वांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांना आमचा शब्द नाकारता आला नाही, असंही पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!