MaharashtraPoliticalUpdate : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली निवडणुकीची वेळ , कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना….

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून दिवाळीपूर्वीच राज्यात धमाका होणार असल्याची अटकळ सत्ताधारी महायुतीने बांधली आहे.
पहलगाम येथे आपल्या देशातील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे ही मागणी होती. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते काम केले, पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सैन्याने चोख उत्तर देत जगाला भारताची ताकद दाखवून दिली, त्यांना मी सॅल्युट करतो, असे अजित पवारांनी नाशिक येथील सभेत बोलताना म्हटले.तुम्ही मजबुतीने सरकारच्या मागे उभं राहिले पाहिजे, असेही अजित पवारांनी म्हटले.
अजित पवार पुढे म्हणले की , राज्यात सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा उभारल्या. त्या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं आहे. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 2022 मध्ये व्हायला पाहिजे, पण आता 2025 उजाडला आहे. आता, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे अजित पवारांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात निवडणुका घ्या, असे निर्देश दिल्याचा संदर्भ अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असेही त्यांनी म्हटले. पूर्वीप्रमाणेच ओबीसींना 27 टक्के आरक्षणाच्या जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकांमध्ये विविध कार्यकर्त्यांना उभारी मिळेल, त्यांनी काम करुन दाखवावं, असे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.