मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया….

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वाभूमीवर आवाज शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील, रश्मी शुक्ला यांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगांनेही चर्चा झाली. यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शरद पवारांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीवर तसेच मनोज जरांगे यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली . पवार म्हणाले की , मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे. मला आनंद आहे, त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपला आमचा विरोध आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी उमेदवार ठेवले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे, असे शरद पवारांनी म्हटले.
निवडणूक आयोगाचा चांगला निर्णय…
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली.
“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे, त्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात. सत्तेच्या गैरवापराबद्दल, त्यांना एक्स्टेंशन देऊन त्यांच्या कालखंडात निर्णय घेण्याचा प्रयत्न होता. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये”, असे शरद पवार म्हणाले.
काँग्रेसकडून बंडखोरी थांबवण्याचे प्रयत्न सुरु
यानंतर शरद पवारांना बंडखोर उमेदवारांबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, ज्या प्रकारे आम्ही दोघांनी प्रयत्न केले तसं काँग्रेसही प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.