BjpNewsUpdate : उद्धव ठाकरे किती रडारड करणार ? भाजपची टीका ….

मुंबई: कार्नाटक , तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि इतर राज्यात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका अशी टीका करत उद्धव ठाकरे आता किती रडारड करणार ? असा सवाल भाजपने विचारला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? असाही सवाल भाजपने उद्धव ठाकरे यांना केला. उद्धव ठाकरे यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली होती. त्याला आता भाजपने उत्तर दिले आहे.
भाजापने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?
पाच राज्यांचा निकाल लागला या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खुले आवाहन दिले. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असे देखील ते या वेळी म्हणाले. सरकारला आणि गौतम अदानी यांना जाब विचारण्यासाठी १६ डिसेंबर धारावीहून अदानींच्या कार्यालायावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.