ParliamentryNewsUpdate : अविश्वास ठरावावरून विरोधकांचा हल्ला बोल , अखेरच्या भाषणासाठी पंतप्रधान लोकसभेत दाखल …

नवी दिल्ली : लोकसभेत गेल्या दोन दिवसांपासून अविश्वास ठरावावरून लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज चर्चेचा शेवटचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदानाकडे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडेही संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ४ वाजता लोकसभेत भाषण करणार आहे. अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांना मोदी उत्तरे देतील असे अपेक्षित आहे. याच भाषणात ते मणिपूरची हिंसा, त्याची कारणे, सरकारने केलेले प्रयत्न आणि सध्याची परिस्थिती यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच मणिपूरमध्ये आतापर्यंत किती नुकसान झालं? किती लोकांचा मृत्यू झाला? किती घरेदारे जाळली गेली आणि किती लोक जखमी झाले याची माहितीही मोदींकडून दिली जाण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या भाषणानंतर लगेचच अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. यावेळी आवाजी मतदान होणार आहे.
आज सभागृहात बोलताना काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला तेंव्हा सभागृहात एकच गोधळ उडाला. यावेळी प्रल्हाद जोशी यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर दाखल करीत पंतप्रधानावरील आरोपावरून चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदी यांची तुलना मॅकबेथ आणि अंध धृतराष्ट्र यांच्याशी केली. त्यानंतर चौधरी यांचे बोलणे झाल्यावर ते बसले तरीही घोषणा चालूच होत्या.
गेल्या दोन दिवसात संसदेत अविश्वास ठरावावर काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई, सपाच्या खासदार डिंपल यादव, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, टीएमसी खासदार सौगत रॉय, डीएमके खासदार टीआर बालू, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस खासदार मनिष तिवारी, जेडीयू खासदार राजीव रंजन सिंह, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाषण केलं. तर सत्ताधारी पक्षाकडून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री नारायण राणे, स्मृती ईराणी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले होते.
विरोधकांचे आरोप काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये का गेले नाही?
मणिपूर हिंसेवर बोलण्यासाठी मोदींना ८० दिवस का लागले?
केवळ ३० सेकंदाचं भाष्य केलं. या ३० सेकंदात मोदी महिलांच्या नग्न धिंड निघाल्याच्या व्हिडीओवर बोलले, मणिपूरमधील हिंसेवर का बोलेल नाही?
मोदींनी मणिपूरमधील लोकांबाबत सहानुभूती का दाखवली नाही? त्यांनी मणिपूरमध्ये शांतता राखण्याचं आवाहन का केलं नाही?
दोन महिन्यांपासून हिंसा सुरू आहे, मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी का केली नाही? राज्यात मोठा हिंसाचार घडल्याचं मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे, असं असताना मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही?
लोकसभेत बहुमत कितीला?
लोकसभेच्या एकूण ५३८ जागा असून बहुमतासाठी २७० मतांची गरज आहे. लोकसभेत भाजपकडे ३०१ जागा असून बहुमतापेक्षाही अधिकच्या जागा सरकारकडे आहेत. सत्ताधारी पक्षाकडे भाजप- ३०१ शिवसेना (शिंदे गट) – १२ लोजपा – ६ अपना दल (एस) – २ राष्ट्रवादी (अजित गट) – १ आजसू – १ एआयएडीएमके – १ मिजो नॅशनल फ्रंट – १ नागा पीपुल्स फ्रंट – १ नॅशनल पीपुल्स पार्टी – १ नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी – १ सिक्किम क्रांतिकारी मोर्चा -१ अपक्ष – २ एकूण – ३३१
विरोधकांचं पक्षीय बलाबल
विरोधी इंडिया आघाडीकड़े काँग्रेस – ५० डीएमके – २४ टीएमसी – २३ जेडीयू – १६ सीपीएम – ३ इंडियन यूनियन मुस्लिम लीग – ३ नॅशनल कॉन्फ्रेंस – ३ सपा – ३ सीपीआय – २ आम आदमी पार्टी – १ जेएमएम – १ केरल काँग्रेस – १ आरएसपी (रेवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी) – १ वीसीके – १ शिवसेना (उद्धव गट) – ७ एनसीपी (पवार गट) – ४ अपक्ष – १ एकूण – १४४
तटस्थ पक्ष आणि त्यांची संख्या
वायएसआर – २२ बीजेडी -१२ बीएसपी – ९ टीडीपी – ३ अकाली दल – २ एआययूडीएफ – १ जेडीएस – १ आरलएपी – १ अकाली दल (सिमरजीत सिंग मान) – १ एआयएमआयएम – २ टीआरएस – ९ एकूण – ६३