ParliamentNewsUpdate : संसदीय कामकाजातून राहुल गांधी यांचे काही शब्द वगळले …
नवी दिल्ली : काल अविश्वास ठरावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील हिंसेवरून मोदी सरकारवर प्रचंड हल्ला चढवला. तुम्हाला मणिपूर हिंसेचं काही पडलेलं नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली आहे. तुम्ही मारेकरी आहात. तुम्ही देशप्रेमी नाहीत. देशद्रोही आहात, हत्यारे आहात असा घणाघाती हल्लाच राहुल गांधी यांनी भाजपवर चढवला होता. आज सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या या भाषणातील काही शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांनी काल दुपारी लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर भाषण केलं. त्यातील काही शब्दांवर आक्षेप घेण्यात आला होता. रात्री उशिरा राहुल गांधी यांच्या भाषणातील अनेक शब्द हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी नोटीसही जारी करण्यात आली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मणिपूरमध्ये भाजप फेल्युअर झाल्याचे म्हटले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली होती. ज्या शब्दांचा वापर करता कामा नये, असे शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. कामकाजातून हत्या, देशद्रोही आदी शब्द वगळण्यात आले आहेत.
काँग्रेस हरकत घेणार
याबाबतची माहिती मिळताच आता काँग्रेसकडून हा मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासमोर उपस्थित करणार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या भाषणात आक्षेपार्ह असं काहीच नाही. त्यामुळे असे शब्द हटवणे योग्य नाही, अंसे काँग्रेसने म्हटलं आहे.
हे आहेत ते शब्द …
स्पीकर सर, त्यांनी मणिपूरमध्ये भारताची… केली आहे. केवळ मणिपूरचीच नाही तर, भारताचीही… केली आहे. यांच्या राजकारणाने मणिपूरलाच नव्हे तर भारताला मणिपूरमध्ये मारलं आहे. भारताची… केली आहे. भारताची मणिपूरमध्ये … केली आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यांच्या भाषणातील ते वादग्रस्त शब्द वगळण्यात आले आहेत. त्यानंतर राहुल गांधी म्हणतात, भारत आपल्या जनतेचा आवाज आहे. हृदयाचा आवाज आहे. त्या आवाजाची तुम्ही मणिपूरमध्ये… केली आहे. याचा अर्थ भारतमातेची… तुम्ही मणिपूरमध्ये केली आहे. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून भारतमातेची… केली आहे. तुम्ही… आहात, तुम्ही देशप्रेमी नाही. तुम्ही… आहात, तुम्ही देशाची मणिपूरमध्ये… केली आहे.
भाजप निशाण्यावर
कालच्या भाषणातून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपने मणिपूर हिंसेवर बोलण्यापूर्वी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. या यात्रेत काय पाहायला मिळालं? लोकांच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर त्यांनी मणिपूरच्या मुद्द्याला हात घालत भाजपवर जोरदार आगपाखड केली होती .