ShivsenaNewsUpdate : चोरलेल्या मुर्तीचे कुणी मंदिर उभारत नाही, संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडले . “शिवसेना हा पक्ष घामातून उभा राहिला आहे. शिवसेनेचा धगधगता इतिहास आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाला चोरता येणार नाही. हल्ली देवाच्या मुर्त्याही लोक चोरतात. पण चोरलेली मुर्ती कुणी मंदिरात ठेवत नाही. तो माणूस ती मुर्ती विकतो, चोरलेल्या मुर्तीचे कुणी मंदिर उभारत नाही. त्यामुळे ही मूर्ती चोरांची अवलाद आली तशी नष्ट होईल”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना बाळासाहेबांचा हात ज्यांनी सोडला तो कायमचा संपला, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातल्या नेत्यांना दिला.
माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना पक्षाची सभा पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, आदी नेते उपस्थित होते. यावेळी राऊतांच्या १२ मिनिटांच्या भाषणाने अख्खं सभागृह स्तब्ध झालं. सुरुवातीला त्यांनी मिश्किल शब्दात एकनाथ शिंदे यांना फटकारे लगावले तर नंतर मात्र बाळासाहेबांची महती सांगताना काही मार्मिक उदाहरणे देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राऊत यांनी सांगितली एका दगडाची गोष्ट…!
“बाळासाहेबांनी एकदा तलावात एक दगड फेकला. त्यांच्याबरोबर त्यावेळी अनेक लोक होते. त्यावेळी त्यांनी सोबतच्या लोकांना दगड बुडण्याचं कारण विचारलं. कुणी म्हटलं की दगड जड होता तर कुणी आणखी काही कारणं सांगितली. मग तिथे एक संजय राऊत नावाचा अतिशहाणा माणूस होता. त्याला बाळासाहेबांनी विचारलं, का रे संजय दगड का बुडाला? त्यावर संजयने सांगितलं, साहेब दगडाने तुमचा हात सोडला…” असा प्रसंग राऊतांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
“आम्ही दगडच आहोत. आम्हालाही शेंदूर बाळासाहेबांनी फासला. पण हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा लोक म्हणायचे हे तीन चाकी सरकार आहे. पण आज चौथं चाक लागलंय ते प्रकाश आंबेडकरांचं.. आणि दोन स्टेफन्या देखील तयार आहेत. त्यामुळे आपली गाडी सुस्साट आहे, पुढचं भविष्य फक्त शिवसेनेचं आहे”, असं राऊत म्हणाले.