MaharashtraPloticalUpdate : मनसे , शिंदे , भाजप युतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा …
नागपूर : दिवाळीनिमित्त मनसेच्या कार्यक्रमात आम्ही एकत्र आले होते. राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. दिवाळीचा सण आनंदाचा साजरा होताना आपण राज्यामध्ये पाहत आहोत. यावेळी आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यानच्या काळात राज ठाकरे , शिंदे आणि फडणवीस यांच्यासह त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा होत आहे. वृत्त वाहिन्यांच्या अंदाजानुसार मनसेकडून या युतीची तयारीही पूर्ण झाली आहे. पण शिंदे गटाकडून अजूनही तळ्यातमळ्यात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या भेटीबद्दल स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार…
याशिवाय शिंदे गटामध्ये आमदार नाराज नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. योग्य वेळी सगळ्या गोष्टी होत असतात, असंही शिंदे म्हणाले. दरम्यान ‘नाना पटोले यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हे भाष्य मुळात हास्यास्पद आहे. आमच्याकडे मोठ बहुमत आहे. भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. ती महिन्यामध्ये ७२ मोठे निर्णय घेतले आहे. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे, तर बाळासाहेबांची शिवसेना हा दुसरा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांना बोलू द्या. विरोधी पक्ष टीका करत आहे. आम्ही त्यांच्या टीकेला कामाने प्रत्युत्तर देऊ’ असा पलटवारही शिंदेंनी केला.
‘परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. निकक्षामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. एनडीआरएफच्या निकक्षापेक्षा जास्त मदत देणार आहोत. समृद्धी महामार्ग आपण लवकरच मोकळा करणार आहोत. शिर्डीपर्यंत प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर शिर्डी ते नागपूर दुसऱ्या टप्प्यात मोकळा केली जाईल. नोव्हेंबर महिन्यातच शिर्डीपर्यंत प्रवासासाठी मोकळा केला जाईल, अशी घोषणाही शिंदेंनी केली.