अजिंक्य असल्याचं भासवणाऱ्या मोदींनी जुने दिवस विसरू नये म्हणत सोनियांनी दिली २००४ ची आठवण !!

‘२००४ साली अटलबिहारी वाजपेयी देखील अजिंक्य असल्याचं अनेकांना वाटतं होतं. राजकीय पंडितही तसेच तर्क लावत होते. मात्र, काँग्रेसनं सगळी तर्कटं फोल ठरवली आणि वाजपेयी सरकार सत्तेवरून खाली खेचले. मोदींनी ते वर्ष विसरू नये,’ असा इशारा यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज दिला. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून सोनिया पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
रोड शो करत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सोनियांनी सहकुटुंब होमहवन केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, जावई रॉबर्ट वाड्रा व नातवंडेही यावेळी त्यांच्यासोबत होती. अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोनियांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. अजिंक्य असल्याचं भासवणाऱ्या मोदींनी जुने दिवस विसरू नये, असं त्या म्हणाल्या.
मोदी स्वतःला जनतेपेक्षा मोठे समजतात…
राहुल गांधी यांनीही मोदींवर टीकास्त्र सोडले. ‘स्वत:ला अजेय व अजिंक्य समजणारे अनेक लोक भारताच्या इतिहासात होऊन गेले. भारतीय जनतेपेक्षा आपण मोठे आहोत असं ते समजत, असा टोला राहुल यांनी मोदींना हाणला. ‘गेल्या पाच वर्षांत मोदींनी लोकांसाठी काहीही केलेले नाही. त्यांनी अनिल अंबानींना कंत्राट का दिले, एवढंच सांगावं,’ असंही ते म्हणाले.
आईच्या बाबतीत प्रियांका झाल्या भावुक…
रायबरेलीच्या जनतेवर माझ्या आईची श्रद्धा आहे. लोकसेवा हाच तिच्या राजकारणाचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी आणि राजकारण्यांनी माझ्या आईचा आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली. सोनिया गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ट्विटकरून आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या ट्विट मध्ये त्या पुढे म्हणाल्या कि, रायबरेलीच्या जनतेविषयी माझ्या आईला श्रद्धा आहे. लोकांची सेवा करणं हेच त्यांच्या राजकारणाचं उद्दिष्ट्य आहे. ज्यांना कुणाला अशी संधी मिळते, त्यांनी जनतेचे आभारच मानले पाहिजे. माझ्या आईचा जनतेशी असलेल्या समर्पित भावनेचा आदर्श सर्वच राजकारणी आणि उमेदवारांनी घ्यावा, असं प्रियांका यांनी म्हटलं आहे.