MaharashtraPoliticalUpdate : …म्हणून कदाचित मुख्यमंत्री तसे म्हणाले असतील , बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर :भाजपमध्ये नैराश्याचे वातावरण आहे, भाजपामधील अनेक जण ते महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार आहेत ते आल्यानंतर भविष्यामध्ये ते भावी सहकारी होऊ शकतात’ असे कदाचित राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असतील त्यामुळे याविषयी त्यांनाच विचारायला हवे अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
अहमदनगर येथे नूतन शासकीय इमारतीची पाहणीसाठी आले असता त्यावेळी ते बोलत होते. सध्या भाजपमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्ष राज्यांमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करत आहे, आणि आगामी तीन वर्षेही सरकार पूर्ण करणार आहे, असा विश्वास व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले कि , ‘आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेले आहे, यासंदर्भात अगोदर त्यांना विचारले पाहिजे, पण दुसरीकडे भाजपात नैराश्य असल्यामुळे आज अनेक जण महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे, ज्यावेळेस ते येतील त्या वेळेला ते भावी सहकारी होतात, असंही थोरात म्हणाले.
दरम्यान ‘राज्यामध्ये पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे अजून पंचनामे होणे बाकी आहे, पाथर्डी शेवगाव या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, मात्र यासंदर्भात सर्व विषयांची कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार असून लवकरच त्यबाबतचा निर्णय घेतला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.
‘जीएसटीचा परतावा हा वेळेमध्ये मिळाला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये राज्य चालवताना आम्ही कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढतो, पण दुसरीकडे आमच्या हक्काचं जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडे अडकलेला आहे, तो ३० ते ४० हजार कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे, वास्तविक पाहतात ते पैसे देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ते पैसे वेळेमध्ये देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने ते पैसे तात्काळ दिले पाहिजे, असेही थोरात म्हणाले.
‘पेट्रोल व डिझेल हे जीएसटीमध्ये आणण्यासाठी चर्चा सुरू आहे, त्याचा राज्यावर काय परिणाम होईल, या प्रश्नाचे उत्तर देताना थोरात म्हणाले की, ‘अगोदर जीएसटीमध्ये आल्यावर किती फायदा आहे व किती तोटा आहे याचा अभ्यास झाल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल’ .