MaharashtraLockDownUpdate : लॉकडाऊन विषयी नवाब मलिक यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आणि टास्क फोर्सच्या बैठकींची सत्र सुरु आहेत. यातच राज्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लावला जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हा लॉकडाऊन नेमका कसा असेल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात सध्याच्या घडीला सेमी लॉकडाऊनची परिस्थिती असल्याचे लक्षवेधी वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात कडक लॉकडाऊन लागणार, की राज्य शासनाकडून सेमी लॉकडाऊनची नियमावली जाहीर होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात केंद्रीय पथकांच्या आढाव्यानंतर देण्यात आलेल्या सुचनांची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरु असल्याचे म्हणत जवळपास 80 टक्के आरटीपीसीआर चाचण्या होत असल्याचे ते म्हणाले. राज्यात दिवसाला 63 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळू लागल्यामुळे आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचे म्हणत बेड्स, ऑक्सीजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकार्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
भाजप राजकारण करीत आहे
येत्या काळात राज्यातील परिस्थिती नेमकी कशी असेल याबाबत सांगताना पुढील सर्व निर्णय हे परिस्थिती पाहून मंत्रीमंडळाच्या बैठकीत होतील असेही ते म्हणाले. विरोधी पक्षांकडून सातत्यानं हातावर पोट असणाऱ्यांच्या आणि गरजूंच्या खात्यात लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी पैसे देऊ करावेत अशी मागणी केली जात आहे. त्यावर उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘भाजपचे लोक पैसे द्या म्हणत आहेत, राजकारण करत आहेत. पण, हे योग्य नाही. पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन लावत असताना कुणाच्या खात्यात पैसे टाकले नव्हते. विरोधक राजकारण खेळत आहेत’.
इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणं आर्थिक मदतीचा ओघ गरजवंतांपर्यंत पोहोचला तसंच चित्र महाराष्ट्रातही होते . मजुरांना जवळपास 4 महिने रोज दोन वेळचे जेवणही देण्यात आले होती , असे म्हणत राज्य शासनावर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे यावर एकदा नजर टाकावी असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.