AccidentNewsUpdate : देवगड फाट्याजवळ भीषण अपघात , जालना जिल्ह्यातील पाच तरुण ठार

औरंगाबाद । नगर महामार्गावरील देवगड फाट्याजवळ कार आणि ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व जालना जिल्ह्यातील आहेत.
मृतांची नावे
१. शंतनू काकडे, ( वय २२, राहणार जयपूर, ता. मंठा, जिल्हा जालना)
(माजी संचालक तथा तालुका सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा मंठा)
२. कैलास नेवरे (वय २३)
(तालुका उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मंठा)
३. रमेश घुगे, ( वय २२)
(सरपंच, मेसखेडा ता. मंठा)
४. विष्णू चव्हाण, (वय २२)
(मेसखेडा, ता. मंठा , जिल्हा जालना)
५. नारायण वरकड
(वय २४, रा. लाळतोंडी, ता. मंठा)
अपघातग्रस्त कार (एमएच २१ बीएफ ७१७८) महामार्गावरील दुभाजक पार करून औरंगाबादहून नगरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल (एमएच १९ वाय ७१२३) बसला देवगड फाटा परिसरात धडकली. अपघाताची माहिती समजताच नेवासे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते , बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे घटनास्थळी पोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून व अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून तब्बल तासभर झालेली वाहतूक कोंडी फोडली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी मृतांजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मृतांच्या ओळखी पटविण्यात यश मिळवले. दरम्यान, घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक विजय करे यांनी भेट देऊन पाहणी केली.