JalnaCrimeUpdate : जमावाने घेतला दोन सख्ख्या भावांचा बळी , तिसरा भाऊ गंभीर , पोळ्याच्या बैलांवरून झाला होता वाद

जालना जिल्ह्यात जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून तिसरा भाऊ गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील पानशेंदरा शिवारात भर दिवसा घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे पानशेंदरा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी १५ संशयितांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पानशेंद्रा येथील बोर्डे बंधूंसोबत पोळ्याला बैलाच्या कारणावरून गावातील काही लोकांसोबत वाद झाला होता. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी वरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बोर्डे बंधूंचा गावकऱ्यांसोबत त्या जुन्या वादातून भांडण झाला. पाहता पाहता या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झालं. जमावाने लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने केलेल्या बेदम मारहाणीत राहुल बोर्डे (वय-25) याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी प्रदीप बोर्डे (वय-23) याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. तर जमावानं केलेल्या मारहाणीत तिसरा भाऊ रामेश्वर बोर्डे (वय-30) हा देखील गंभीररीत्या जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह पोलीसांचा मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.