‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : उसामनाबादच्या हणमंत पुरीसह कात्रजच्या आबासाहेब अटकळने पटकावले सुवर्ण पदक

पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ६३ व्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ला शुक्रवारी दिमाखदार सोहळ्यात सुरुवात झाली. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. या स्पर्धेत गतविजेत्या बाला रफीक शेखवर सर्वांच्या नजरा असणार असून त्याच्यासमोर पुन्हा एकदा गेल्या वर्षीचा उपविजेता अभिजित कटकेचे तगडे आव्हान असणार आहेत. दरम्यान, माती विभागात ७९ किलो वजनी गटात उस्मानाबादचा हणमंत पुरीने तर ५७ किलो वजनी गटात आबासाहेब अटकळे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
कालच्या पहिल्याच दिवशी ५७ आणि ७९ किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात (७९ वजनी गट- माती विभागात) उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सोलापूरच्या सागर चौगुलेला ५-० गुणाने हरवत सुवर्णपदक पटकाविले. तसेच रौप्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर ८-२ अशी मात करीत रौप्य पदक पटकाविले.
५७ किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये ८-८ अशी बरोबरी झाली. यावेळी आबासाहेब यांनी शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत. तर ७९ किलो गादी गटात रामचंद्र कांबळे (सोलापूर) याने कोल्हापूर शहराच्या निलेश पवार वर १३ विरुद्ध ४ गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरे याने श्रीधर मुळे (सातारा) याच्यावर ४ विरुद्ध १ अशा गुण फरकाने मात देत अंतिम फेरी गाठली.
आज , ४ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांची गादीवरील लढत होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक वजनी गटातील पदकविजेत्या मल्लाला रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानुसार, सुवर्णपदक विजेत्याला २०,००० रुपयांचं, रौप्यपदक विजेत्याला १०,००० रुपयांचं तर कांस्यपदक विजेत्याला ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.