Prakash Ambedkar : काँग्रेस आघाडीला प्रकाश आंबेडकरांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम !!

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर….
भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख व बहुजन वंचित आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीच्या युतीच्या पर्यायाबद्दल आणखी दोन दिवस अल्टिमेटम दिला असून संघाबाबत काँग्रेसने २८ तारखेपूर्वी अर्थात गुरुवारपर्यंत भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा १ मार्च रोजी वंचित आघाडीच्या सर्व ४८ उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही व जातीय मतांचे राजकारण सुरू असून महाआघाडीत आमचा समावेश करण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावावर अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नसल्याचे आंबेडकर म्हणाले. चंद्रपूर येथील कार्यक्रमानिमित्त येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
” हा प्रकाश आंबेडकरांनी महत्वाचा संदेश दोन्हीही काँग्रेसला दिलेला असताना प्रसार माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करीत गडकरी देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत त्यांनी केले असल्याच्या बातम्या दिल्या आहेत . वास्तविक नितीन गडकरी हे संघाचे पुढील पंतप्रधान असल्याचा प्रचार करण्यात येतो आहे असे वक्तव्य केले आहे . “
भाजप-शिवसेना युती झाल्याचा फटका उभय पक्षांनाच बसणार असल्याचे नमूद करून भाजपकडील मतदारसंघात सेनेचे आणि सेनेकडील मतदारसंघात भाजपचे कॅडर संपुष्टात येईल, असे भाकितही आंबेडकर यांनी व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत करून प्रकाश आंबेडकर यांनी या कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे सांगितले. भारताला आपली शक्ती दाखवणे आवश्यक होते. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करावी. सरकारने आधीच हा निर्णय घेतला असल्यास योग्य पाऊल ठरेल. प्रत्येकवेळी अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भविष्यात पंतप्रधान होतील, असा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात येत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गडकरींविरुद्ध निवडणूक लढवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या विरुद्ध आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही तर, संघाकडून गडकरींचा पंतप्रधानपदासाठी प्रचार सुरू आहे. गडकरी यांच्या कामाचे काँग्रेस नेत्यांकडून कौतुक केले जाते आणि ते स्वत: पंडित नेहरू यांच्या धोरणांचा गुणगौरव करतात. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याची शंका उद्भवली आहे. ही शंका खोडून काढण्यासाठी काँग्रेसने एखादा बडा नेता मैदानात उतरविणे आवश्यक आहे. त्यामुळे गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी द्यावी किंवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना दिले. ‘भाजपाच्या कट्टर हिंदुत्वाविरोधात काँग्रेसनं मवाळ हिंदुत्वाचा मार्ग धरला आहे. मवाळ हिंदुत्व आणि मनुवाद यावर काँग्रेस आणि संघाचे विचार जुळतात,’ अशी टीका आंबेडकरांनी केली.