मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात – आयुक्त चिरंजीव प्रसाद

औरंगाबाद विधानसभेसाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाचा भर असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. मतदान काळात कोणताही गैरप्रकार होवू नये यासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती प्रसाद यांनी शनिवारी (दि.१९) दिली.
लोकसभा निवडणूका शांततेत पार पाडल्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या प्रारंभी शहरात काही अप्रिय घटना घडल्या होत्या. परंतु आता विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी शहरातील विविध मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान शांततेत होवून कोणत्याही मतदान केंद्रावर गैरप्रकार होवू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त राहणार. बंदोबस्तासाठी सशस्त्र दलाच्या चार कंपन्या शहरात दाखल झाल्या असून त्यात तीन कंपन्या सीआयएसएफ जवानांच्या आहेत. तर एक कंपनी राज्य राखीव दलाची आहे. सोबतच होमगार्डचे २०० जवान, १ पोलिस अधीक्षक दर्जाचा अधिकारी, २ उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी, २० वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. बंदोबस्त कामासाठी पोलिसांनी १०० वाहने भाडेतत्वावर घेतली आहेत. गृहविभागाकडून औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाला अत्याधुनिक वॉकीटॉकी व वायरलेस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील संवेदनशिल आणि अतीसंवेदनशिल मतदान केंद्रावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. तसेच या मतदान केंद्रावर अतिरीक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे ही पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.