विधानपरिषद निवडणूक : औरंगाबादमध्ये आज मतदान

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारसंघात आज निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये लक्ष घातलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी युतीच्या सर्व मतदारांना तंबी दिली आहे. तसंच गद्दारी केल्यास सोडणार नाही, असा इशाराही दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांच्याकडे सेनेएवढे संख्याबळ नाही. मात्र दुसऱ्या पसंदीच्या मतदानाची त्यांना आशा आहे.
विधानपरिषद निवडणुकीत एकूण 556 मतांपैकी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या अंबादास दानवे यांच्याकडे युतीचे 336 मतदान आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीच्या अंबादास दानवे यांचा विजय पक्का समजला जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांच्यासाठी ही लढत फारच कठीण आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडीले आणि माजी महापौर त्रंबक तुपे तसंच गटनेते विकास जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.