Rajasthan : अलवार जिल्ह्यातील झुंडबळी ठरलेल्या हरीश जाटवच्या पित्याची पोलिसांच्या तपासावर नाराज होऊन आत्महत्या

राजस्थानमधील अलवर जिल्हा झुंडबळीच्या घटनांमुळे बदनाम झाला असतानाच भिवाडी येथे गेल्या महिन्यात घडलेल्या हरीश जाटव झुंडबळी प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. हरीशचे वडील रतीराम जाटव यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रतीराम यांनी आज सायंकाळी सेल्फॉस हे कीटकनाशक प्राशन केलं. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने तिथून त्यांना अलवर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची सूचना डॉक्टरांनी केली. दरम्यान, अलवरला जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
हरीशच्या हत्येप्रकरणी चौपानकी पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावर रतीराम नाराज होते. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. उलट हरीशचा मृत्यू अपघाती असल्याचे दाखवण्याचा व प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू होता. या सर्व प्रकाराला कंटाळूनच रतीराम यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
झिवाणा गावातील हरीश जाटव हा २८ वर्षीय दलित तरुण १६ जुलैच्या रात्री फसला गावात गंभीररित्या जखमी व बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्याला अधिक उपचारांसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे १८ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, १७ जुलै रोजी हरीशच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. बाइकच्या धडकेवरून हरीशला जमावाने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला मात्र हे झुंडबळीचे प्रकरण असल्याचा दावा पोलिसांनी फेटाळला होता.