चोरांची पण हद्द झाली , पुरग्रस्तांच्या घरावर केला हात साफ … !!

महापूर ओसरल्यानंतर चिखली, लक्ष्मीपुरी येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह सुमारे चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस आणि (ता. करवीर) येथील दोन घरांमध्ये मंगळवारी चोरी झाली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व करवीर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापुरात चिखली, आंबेवाडीसह शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसर पाण्याखाली गेला होता. येथील अमोल मनोहर कांबळे (वय ३५) यांचे रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस शेजारी घर आहे. त्यांच्या घरी पुराचे पाणी आल्याने त्यांनी सोन्याचांदीचे दागिने, रोकड लोखंडी तिजोरीत ठेवले व ते घर बंद करून श्रमिक हॉल येथे राहण्यासाठी गेले. पाणी ओसरल्यानंतर ते कुटुंबासह घरी गेले असता, दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामध्ये १८ हजारांची रोकड, सोन्याचे गंठण, ब्रेसलेट, नेकलेस, वेलजोड, कर्णफुले, चेन, अंगठ्या असे १२ तोळे दागिने, चांदीच्या वस्तू असा सुमारे अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
दुसरी चोरी चिखली (ता. करवीर) येथे झाली. येथील नितीन नाना कांबळे (३५) यांच्याही घरी पाणी आल्याने ते स्थलांतरित झाले होते. ते पाणी ओसरल्यानंतर घरी गेले असता घराचा दरवाजा मोडलेला दिसला. त्यांच्या घरातून ३५ हजार रूपये रोकड, सोन्याची चेन, वळे, बदाम, चांदीचे ब्रेसलेट, करदोडा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, महापुरात अडकलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष केले असून आठवडाभरापूर्वी कसबा बावडा येथून ८० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते.