ठाणे जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच 100 हुन अधिक जण पुराच्या पाण्यात अडकले, हवाई दलाच्या साह्याने मदतकार्य

ठाणे जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून विविध भागांत पुराच्या पाण्यामध्ये १०० पेक्षा अधिकजण अडकले असून भारतीय हवाई दलाच्या साह्याने मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.कल्याण तालुक्यातील वरप गावात पुराचे पाणी शिरले असून येथील पेट्रोल पंप पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी अचानक घुसल्याने पेट्रोल पंपावर अनेक वाहने अडकली आहेत. पेट्रोल पंपाच्या इमारतीच्या छतावर किमान ७० जणांनी आसरा घेतला आहे. दुसरीकडे शहाडपासून ४६ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्येही ४५ जण अडकले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, असे राज्याच्या मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे.
दोन्ही ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सकाळी ११च्या सुमारास हवाईदलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनतर हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर तातडीने रवाना करण्यात आली व बचावकार्य सुरू करण्यात आलं. एनडीआरएफ, स्थानिक पोलीसही बचावकार्यात साह्य करत आहेत.
दरम्यान, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून उल्हास नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याने पात्र सोडल्याने अनेक रस्ते तसेच वस्त्या जलमय झाल्या आहेत. या स्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
कल्याण-मुरबाड मार्गावर उल्हान नदीकिनारी असलेल्या रिव्हर विंड्स रीसॉर्टमध्ये अडकलेल्या ९ जणांना नौदलाच्या हेलिकॉप्टरने सुखरूपपणे बाहेर काढले असून रेड चिली हॉटेल व वरपमधील पेट्रोल पंपावर अडकलेल्या किमान १०० जणांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लष्कर, एनडीआरएफ, कल्याण अग्निशमन दलही बचावकार्यात सहभागी झालं आहे.