ICC World Cup 2019 : अखेर रवी शास्त्री यांनी सांगितले धोनीच्या सातव्या स्थानाचे रहस्य ….

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत असतानाच टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर मौन सोडलं आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असं स्पष्टीकरण शास्त्रींनी दिलं आहे.
धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचं त्यावर एकमत होतं. विशेष म्हणजे हा काही मोठा निर्णय नव्हता. हा साधारण निर्णय होता. दुसरं असं की धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असं तुम्हाला वाटतं का?, असा सवालही शास्त्रींनी केला. सेमीफायनलमध्ये भारताला अवघ्या १८ धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. सेमीफायनलच्या सामन्यात धोनीने ५० धावा केल्या होत्या, पण धावा घेण्याच्या नादात तो पायचीत झाला आणि भारताची जिंकण्याची सर्व आशा मावळली. त्यामुळेच सुनील गावसकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं.
त्यावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी हा खुलासा केला. धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नंतर फायदा करून घ्यायचा होता. तो मॅच विनर आहे. त्याचा असा उपयोग करून घेतला नसता तर तो गुन्हाच ठरला असता. संपूर्ण संघाचं त्यावर एकमत होतं, असं शास्त्री म्हणाले.
मिडल ऑर्डरमध्ये भारताला चांगल्या फलंदाजांची गरज असल्याचंही त्यांनी मान्य केलं. मिडल ऑर्डरला चांगले फलंदाज नसल्याची कमतरता जाणवल्याचं सांगतानाच मिडल ऑर्डरला चांगले फलंदाज ठेवणं ही आता भविष्यातील गोष्ट आहे. इथे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. केएल राहुल होता, पण शिखर धवन जखमी झाला होता. त्यानंतर विजय शंकरचं जखमी होणं हा संघासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे संघाची एकबाजू कमकुवत झाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.