Maharashtra : ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० पार’ , विधानसभेसाठी भाजपची नवी घोषणा

Maharashtra CM Devendra Fadnavis will take out Rath Yatra around all assembly constituencies of the state as a part of assembly election campaign with slogans "Fir ek baar Shivshahi sarkaar" and "abki baar 220 ke paar". The Rath Yatra will start in August. (File pic) pic.twitter.com/naDNpiaIX9
— ANI (@ANI) June 22, 2019
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा रथयात्रा काढणार असल्याचे वृत्त आहे. या रथयात्रेची ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० के पार’ या टॅगलाईन असणार आहेत. एएनआयने मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने याबाबत ट्विट केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मतदारसंघांमधून ही रथयात्रा जाणार असून यामध्ये ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० पार’ या प्रमुख घोषणा असणार आहेत.
निवडणुकांपूर्वी रथयात्रेचे आयोजन करण्याची भाजपामध्ये प्रथा आहेच. यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेकदा रथयात्रा काढल्या आहेत. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढण्यात येणार आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीसाठी अवघे तीनच महिने शिल्लक असल्याने आता सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात होईल. यामध्ये शिवसेनेने आघाडी घेतली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून विधानसभेवर भगवा फडकवण्याच्या संकल्पपूर्तीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आता भाजपानेही रथयात्रेची घोषणा करुन आपणही तयारीत असल्याचे सुचवले आहे.