BMC निवडणुकीआधी महायुतीत वादळ; रामदास आठवले नाराज, मुंबईत RPI स्वबळावर निवडणूक लढवणार
महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या आणि विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, केंद्रीय मंत्री आणि RPI प्रमुख रामदास आठवले यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत.
रामदास आठवले म्हणाले की, “नागपूर, अमरावती, औरंगाबादसारख्या (Chh. Sambhajinagar) महत्त्वाच्या शहरांत आम्हाला एकही जागा देण्यात आलेली नाही. नालासोपाऱ्यातही RPI ला डावलण्यात आलं. भिवंडीत फक्त एकच जागा मिळाली, तर कल्याण-डोंबिवलीत एकही नाही. भाजप आपल्या पक्षाचा विस्तार करत आहे, हे आम्हाला मान्य आहे; पण मित्रपक्षांकडेही लक्ष द्यायला हवं. RPI कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे.”
मुंबईत महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढण्याचा निर्णय
आठवले यांनी स्पष्ट केलं की, “मुंबईत आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. आता मुंबईत RPI स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.”
मात्र राज्यातील इतर ३८ ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं.
BMC निवडणुकीतील सध्याचे राजकीय गणित
- भाजप : 137 जागा
- शिवसेना (शिंदे गट) : 90 जागा
- एकूण BMC जागा : 227
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस : स्वतंत्र लढत असून, आतापर्यंत 64 उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीआधी झालेल्या चर्चेनंतर भाजप–शिवसेना जागावाटपावर एकमत झालं. मात्र महायुतीतील इतर घटक पक्षांना अपेक्षित वाटा न मिळाल्याने अंतर्गत असंतोष वाढताना दिसत आहे.

2017 चा इतिहास आणि पुढील आव्हान
२०१७च्या BMC निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोठी मजल मारत ८२ जागा जिंकल्या होत्या, तर अविभाजित शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या.
आता मात्र RPI कडून थेट बंडखोरीचा सूर उमटल्याने महायुतीसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही RPI स्वबळावर लढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
