Loksabha राहुल गांधी विरुद्ध अमित शहा वाद : SIR चर्चेत ओपन चॅलेंज, आरोप-प्रत्यारोपांनी अधिवेशन तापले
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) विषयावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात जोरदार वादावादी झाली. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भरसभागृहातच अमित शहांना ओपन चॅलेंज दिले, ज्यामुळे क्षणभर वातावरण तापले.
अमित शहांची विरोधकांवर खोटेपणा पसरवल्याची टीका
अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना विरोधकांवर SIR संदर्भात जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता, त्यालाही शहा यांनी प्रत्यूत्तर दिले.
राहुल गांधींचे प्रेस कॉन्फरन्स चॅलेंज; शहा संतापले
शहा यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधी उभे राहिले आणि म्हणाले की त्यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यावे. त्याचबरोबर त्यांनी अमित शहांना थेट आव्हान दिले. “अमित शहाजी, माझ्यासोबत प्रेस कॉन्फरन्समध्ये चर्चा करण्याचं धाडस करा.”
हे ऐकताच गृहमंत्री संतापले आणि म्हणाले, – “संसद अशा प्रकारे चालणार नाही. मी कधी आणि कसा बोलायचा ते मी ठरवतो.”
१९ लाख बनावट मतदार’ — राहुल गांधींचा आरोप
राहुल गांधी यांनी हरियाणात १९ लाख बनावट मतदार असल्याचा दावा करत सरकारवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप पुन्हा उपस्थित केला. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘पूर्ण प्रतिकारशक्ती’ देण्यामागील हेतूही सरकारने स्पष्ट करावा, अशी मागणी केली.
“संसद तुमच्या मनाने चालणार नाही” – अमित शहा
राहुल गांधी मध्येच बोलू लागल्याने शहा यांनी नाराजी व्यक्त करत ठणकावून सांगितले,
“मी ३० वर्षांपासून संसदेत निवडून आलो आहे. माझ्या भाषणाचा क्रम तुम्ही निश्चित करू शकत नाही.”
यावर राहुल गांधी म्हणाले, “ही बचावात्मक प्रतिक्रिया आहे, चिंतेतून आलेलं उत्तर आहे. हा खरा प्रत्युत्तर नाही.”
अधिवेशनात तणाव कायम
या चकमकीनंतर सभागृहात गोंधळ उसळला. अध्यक्षांना हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्यासाठी वारंवार आवाहन करावे लागले. SIR वरील चर्चा होण्याऐवजी आता ती सत्ताधारी-विरोधक संघर्षाचा नवा केंद्रबिंदू बनत आहे. संसदेतील हा वाद आगामी दिवसांतही राजकीय वातावरण तापवणार हे निश्चित
