MaharashtraPoliticalUpte : एकनाथ शिंदे-आनंदराज आंबेडकरांच्या युतीची घोषणा
मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिंकण्यासाठी मोठी खेळी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे. एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. या निर्णयामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना हे दोन्ही पक्ष एकाच मंचावर दिसतील. यानिमित्ताने आयोजित दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असेल यावरही भाष्य केले.
आम्ही दोघेही रस्त्यावरचे कार्यकर्ते …
भूतकाळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. नंतर मात्र ही युती टिकली नाही. भविष्यात तुमचीही युती कायम राहील हे कशावरून? असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. यावर शिंदे यांनी भविष्यातही आमची युती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आम्हाला एकमेकांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांचे विचार जुळत आहेत. आम्ही दोघेही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या महायुतीत कुठेही अडचण येणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
रिपब्लिकन सेनेला कोणाच्या कोट्यातून जागा मिळणार?
आमची महायुती आहे. महाविकास आघाडी स्वार्थासाठी आली होती, असा टोला लगावत आम्ही लोकांच्या कल्याणासाठी एकत्र आलो आहोत, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. पुढे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांच्यात युती झालेली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला कोणाच्या कोट्यातून जागा मिळणार? असा सवाल शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ते म्हणाले की, एवढ्या लवकर जागावाटपाची चिंता करण्याची गरज नाही. अजून महापालिकेच्या निवडणुकीला वेळ आहे. आम्ही मनाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे जागावाटपाचा विषय आमच्यासाठी गौण आहे. शिंदे यांच्या उत्तरामुळे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत जागावाटपावर नेमकं काय ठरलं? अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अनेक चांगल्या योजना महाराष्ट्रात आल्या, शोषित, वंचित, गरिबांसाठी त्यांनी केलेलं काम चांगलं आहे. त्यामुळे, कुठल्याटी अटी न बांधता आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचं ठरवलं आहे. केवळ, आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्या, अशी विनंती आम्ही केली असून त्यांनी ती मान्य केल्याचंही आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
