Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एनसीइआरटीच्या आठवीच्या पुस्तकात बदलला इतिहास !! इतिहासातले काळे अध्याय असा उल्लेख….

Spread the love

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या आठवीच्या पुस्तकात मुघल शासक बाबर हा अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता असा उल्लेख करण्यात आला आहे. बाबरने अनेक शहरांमध्ये लोकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली असा उल्लेख यात करण्यात आला आहे. या पुस्तकातील बदलांमुळे वाद होण्याची चिन्हं आहेत.

NCERT च्या पुस्तकात अकबराचं शासन हे क्रौर्य आणि सहिष्णुता यांचा ताळमेळ असलेलं होतं हा उल्लेख करण्यात आला आहे. तर पुस्तकात औरंगजेबाने मंदिरं आणि गुरुद्वारे तोडले असाही उल्लेख करण्यात आला आहे. मुघल काळात धार्मिक वातावरण कसं होतं ते या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.

इतिहासातले काळे अध्याय असा उल्लेख करत मुघलांचा इतिहास एनसीआरईटीच्या या आठवीच्या पुस्तकात लिहिण्यात आला आहे. तसंच हा उल्लेखही करण्यात आला आहे की इतिहासात घडलेल्या घटनांबाबत आज कुणाला जबाबदार धरता येणार नाही. समाजशास्त्र विषयाचं हे आठवीचं पुस्तक याच आठवड्याच्या सुरुवातीला प्रकाशित करण्यात आलं. मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचा समावेश आठवीच्या या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.

१३ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंतचा इतिहास

Reshaping India’s Political Map नावाचा भाग या पुस्तकात आहे त्यात १३ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत काय घडलं त्या प्रमुख घटनांचा उल्लेख आहे. दिल्ली साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मुघल शासन, शिखांचं आगमन या सगळ्या विषयांचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्या काळात खेडेगावांची रचना आणि शहरांची रचना कशी होती यावरही हे पुस्तक भाष्य करतं. मुघलांच्या सेनेने अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये कशी लूटमार केली, मंदिरं, धार्मिक स्थळं कशी तोडली हेदेखील सांगितलं आहे.

पुस्तकातले काही ठळक उल्लेख

अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम, रामेश्वरम यांसारख्या मंदिरांवर हल्ले केले. मुघल काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांतील मंदिरांमध्ये असलेल्या मूर्ती फोडण्यात आल्या आणि लूट करण्यात आली. बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लावण्यात आला होता. तसंच त्यांचा मुघलांकडून अपमान केला जात होता. तुम्ही धर्म बदला आणि इस्लाम स्वीकारा असंही त्यांना सांगितलं जात होतं. बाबर हा अत्यंत क्रूर शासक होता. त्याने शहरांवर हल्ले करुन लोकांची हत्या केली. महिला आणि लहान मुलांना कैदेत टाकलं होतं. औरंगजेबाने मथुरा, सोमनाथ येथील मंदिरं आणि जैन मंदिरं तोडली तसंच त्याने शिखांच्या गुरुद्वाऱ्यांवरही हल्ले केले असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!