मुघल गार्डन नंतर आता राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि आणि अशोक हॉल चेही बदलले नाव…

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात नावे बदलण्यावर अधिक भर आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आले होते आता पुन्हा राष्ट्रपती भवनातील काही अत्यंत महत्त्वाच्या हॉलपैकी दरबार हॉल आणि अशोक हॉल या दोन हॉलची नावे बदलण्यात आली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच यासंदर्भातली घोषणा केली आहे.
दरबार हॉल आणि अशोक हॉल हे राष्ट्रपती भवनातल्या काही महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉल आहेत. यातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदानासारखे अनेक महत्त्वाचे सोहळे पार पडतात. तर दुसरीकडे अशोक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात. या दोन्ही हॉलची नावे बदलण्यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले असून त्यात यासंदर्भात प्रयत्न केले जात होते, असे नमूद करण्यात आलं आहे.
https://x.com/ANI/status/1816393753617154193?
“राष्ट्रपती भवनातील वातावरण हे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि तत्वांचं प्रतिबिंब असावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत”, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.या नव्या बदलानुसार राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामकरण आता ‘गणतंत्र मंडप’ असे करण्यात आले आहे. तर अशोक हॉल इथून पुढे ‘अशोक मंडप’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘दरबार हा शब्द प्रामुख्याने भारतीय शासक व ब्रिटिशांच्या न्यायनिवाड्याच्या जागेशी संबंधित आहे. पण भारत प्रजासत्ताक राष्ट्र अर्थात गणतंत्र झाल्यापासून हा शब्द गैरलागू झाला आहे. गणतंत्र पद्धती ही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अगदी प्राचीन काळापासून रुजलेली आहे’, असे या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
अशोक हॉल हा मुळात बॉलरूम म्हणून वापरला जायचा. अशोक हा शब्द सर्व प्रकारच्या शोकापासून , वेदनांपासून मुक्त अशा अर्थाने वापरला जातो. सम्राट अशोकाच्या नावाने हे नाव जोडले जाते . त्याशिवाय, भारतीय रूढी-परंपरांमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या अशोक वृक्षाशीही हे नाव जोडले जाते . ‘अशोक हॉलचे नामकरण अशोक मंडप असे केल्यामुळे भाषेची एकता साधली जाते, नावांच्या इंग्रजीकरणापासून दूर राहता येते आणि अशोक शब्दाशी निगडीत मुलभूत तत्वही त्यातून प्रतिबिंबित होतात’, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुघल गार्डनचेही बदलले होते नाव…
दरम्यान गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आले होते. “स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी भवनातील सर्व उद्यानांना एकच सामायिक नाव म्हणून अमृत उद्यान हे नाव दिलं आहे”, अशी माहिती त्यावेळी राष्ट्रपतींच्या माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी दिली होती. याशिवाय दिल्लीतील काही रस्त्यांची नावेही बदलण्यात अली होती. यावरून विरोधकांनी सरकावर टीका केली होती.